सुनेत्रा पवारांना खासदारकी, केंद्रातील निधी खेचण्याचा प्रयत्न पण कौटुंबिक दरी अधिक रुंदावणार!

दीपक पडकर, बारामती : बारामतीतील टोकाच्या राजकारणाचा नवा अध्याय आजपासून सुरु झाला. लोकसभा निवडणूकीत भावजय सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव सुप्रिया सुळे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागणारा हा पराभव ठरला. आता सुळे यांना शह देण्यासाठी थेट सुनेत्रा पवार यांना मागच्या दाराने का होईना राज्यसभेची खासदारकी दिली गेली आहे. त्यातून या दोन्ही गटात बारामतीत संघर्ष होण्याची यापुढील काळात दाट शक्यता आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, समीर भुजबळ, बाबा सिद्धिकी यांसारखे पक्षातील अनेक नेते इच्छुक होते. परंतु त्यांना बाजूला सारून अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकीत महत्वाची भूमिका बजावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना मुरब्बी शरद पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष करत कन्या सुप्रिया यांचा विजय खेचून आणला. विशेष म्हणजे बारामतीत येवून महायुतीच्या विजयाचे गणित मांडणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचेच गणित कच्चे असल्याचे शरद पवार यांनी दाखवून दिले. अजित पवार सोबत असताना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा यंदा सुळे यांचे मताधिक्य वाढले.
बारामतीत पुन्हा काकांचा बोलबाला! अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार पुन्हा रिंगणात

बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा क्षेत्रात दत्तात्रय भरणे, राहुल कुल, अजित पवार, भीमराव तापकीर हे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत. इंदापूरमध्ये माजी आमदार हर्षवर्धन पाटील, दौंडला रमेश थोरात, पुरंदरला विजय शिवतारे हे सोबत असताना महायुतीला येथे मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदारही आता चिंतेत आहेत. दुसरीकडे बारामतीच्या होम ग्राऊंडनेही अजित पवार यांना साथ दिली नाही. त्यामुळे त्यांच्याही अडचणी वाढल्या.


पत्नीचा पराभव झाल्यापासून अजित पवार बारामतीत आले नाहीत. आता ते पत्नीला खासदार करूनच बारामतीत येतील. पण ही खासदारकी जनतेतून नव्हे तर राज्यसभेची असेल. सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या बळावर केंद्रातून निधी खेचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे विजय झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लागलीच मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. या दोघीही आपापल्या अस्तित्वासाठी यापुढील काळात झगडतील अशी चिन्हे आहेत. त्यातून विकासाची कामे मार्गी लागतील परंतु कौटुंबिक दरी अधिक रुंदावेल, राजकीय इर्षा टोकाचे स्वरुप घेईल, अशी शक्यता आहे.