सतत मोबाईलवर असल्याने भावाला राग, जबर मारहाण करत बहिणीचे केस कापले; मुंबईत संतापजनक घटना

प्रतिनिधी, मुंबई : मोबाइलवर सतत असलेल्या दोन बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चुलत भावाने त्यांचे केस कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा अमानवी प्रकार समोर आल्यानंतर बहिणीने केलेल्या तक्रारीवरून ऋषभ रुद्रम्मा याच्याविरुद्ध अँटॉप हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अँटॉप हिलच्या विजयनगर परिसरात रमा (२०) आणि राखी (१५) (बदललेली नावे) या दोघी आई, वडील आणि भावासोबत वास्तव्यास होत्या. घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती आणि त्यातच या दोघींच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईच्या खांद्यावर येऊन पडली आणि कुटुंबाला पोसताना तिची दमछाक होऊ लागली. त्यामुळे रमा आणि राखी यांना याच परिसरात राहणारा चुलत भाऊ ऋषभ याच्याकडे पाठवण्यात आले. आर्थिक खर्च पेलवत नसल्याने ऋषभ याने दोघींना शाळा, कॉलेजमध्ये जाण्यास मनाई केली. दोघीही घरीच राहून काम करायच्या. रमा आणि राखी दोघी कायम मोबाइलवर असल्याने ऋषभ याचे त्यांच्यासोबत खटके उडायचे.
Weather Update : पाच दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापणार, पुढील आठवड्यासाठी IMD कडून पावसाचा अंदाज काय?

बुधवारी मध्यरात्री रमा मोबाइलवर असल्याचे ऋषभने पाहिले आणि त्याने दोघींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासाला कंटाळून रमा हिने आपण एका तरुणासोबत बोलत असून त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. तिच्या या उत्तराने ऋषभ संतापला आणि त्याने घरातील लोखंडी चिमट्याने दोघींना मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, त्याने या दोघींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे राखी बेशुद्ध पडली. मात्र ती मुद्दाम झोपेचे सोंग करत असल्याचे समजून, ऋषभ याने घरातील कात्रीने तिचे आणि रमा हिचे केस कापले.

हा सर्व प्रकार पाहून आजुबाजूच्या महिला पुढे आल्या आणि त्यांनी ऋषभच्या तावडीतून दोघींची सुटका केली. राखी शुद्धीवर आल्यानंतर, दोघींनी भावाच्या या अमानवी कृत्याची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी मारहाण, धमकी, मुंबई बाल अधिनियम १९४८ यांसह इतर कलमान्वये ऋषभ याच्यावर गुन्हा दाखल केला.