शरद पवार १९९६ मध्येच पंतप्रधान असते, कच खाल्ल्याची बोच आजन्म, प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

मुंबई : शरद पवार यांनी ठाम भूमिका घेतली असती तर ते सन १९९६ मध्येच पंतप्रधान झाले असते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी केला. त्यावेळी पवार यांनी कच का खाल्ली याची बोच आजन्म राहणार असल्याचेही पटेल यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले. शरद पवार यांचा भाजपसोबत जाण्याकडे कल होता, मात्र तशी संधी वेळोवेळी येऊनही त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागली, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान होण्याची संधी यशवंतराव चव्हाण यांनी दवडल्याची खंत आजवर शरद पवार यांनी अनेक ठिकाणी बोलून दाखवली आहे. तशाच प्रकारची खंत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याविषयी बोलून दाखवली. मराठी माणूस भारताचा पंतप्रधान झाला नाही याची खंत नेहमीच राहिलेली आहे. मात्र, २८ वर्षांपूर्वी आयती संधी चालून होती.
भाजपकडून लोकसभेची सक्ती, पण आता थांबण्याची वेळ, ही माझी शेवटची निवडणूक, नारायण राणेंची घोषणा
१९९६ मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी अवघ्या अकरा महिन्यांत काढून घेतला. त्यावेळी शरद पवार हे लोकसभेतील काँग्रेसचे नेते होते. अकरा महिन्यांनंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागते की काय या विचाराने काँग्रेस खासदार कमालीचे अस्वस्थ झाले होते. जनतेसमोर आपण कोणत्या तोंडाने जाणार आणि सरकारचा पाठिंबा का काढून घेतला याविषयी काय सांगणार, हा प्रश्न पडला होता. त्यावेळी मीसुद्धा खासदार होतो. पाठिंबा काढून घेण्याच्या घोषणेनंतर मी शरद पवार यांच्या ‘६, गुरुद्वारा रकाबगंज’ या शासकीय निवासस्थानी पोहोचलो. पवारांच्या संमतीने मी आणि इतरांनी मिळून तातडीने सर्व काँग्रेस खासदारांना बोलावणे धाडले आणि दोन तासांत ११५ पेक्षा जास्त खासदार जमा झाले. विशेष म्हणजे, त्यावेळी जमलेल्या खसदारांनी जी भाषणे केली त्यात काँग्रेसमधील शरद पवार यांचे विरोधकही आक्रमक होऊन पवारांनी पक्षनेतृत्व हातात घेऊन केसरी यांची गच्छंती करावी, अशी जोरकस मागणी केली होती. ते पाहून आम्ही सर्व अवाक्‌ झालो होतो.
तोंडातला घास हिसकावला, पण माझ्यात पतंगरावांचे गुण, वादळात दिवा लावेन, विश्वजीत कदमांचा इशारा
ही बैठक सुरू असतानाच बंगल्यावर पंतप्रधान देवेगौडा यांचा फोन आला. मी हा फोन घेतला आणि देवेगौडा यांनी मला त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले. मी तातडीने तिकडे पोहोचलो. देवेगौडा म्हणाले, ‘तुम्ही काँग्रेस अध्यक्षांशी बोलून घ्या, मी राजीनामा द्यायला तयार आहे.’ त्यावेळी देवेगौडा यांनी स्वत:चा राजीनामाही दाखवला. त्यांचे म्हणणे होते, ‘किमान १५ दिवस हे सरकार राहू द्या. त्यानंतर मी राजीनामा देईन आणि आपण शरदरावांना पंतप्रधान म्हणून घोषित करूया.’ पण, शरद पवार यांनी तो निर्णय घेतला नाही. अनेकदा शरद पवार यांना मी तो निर्णय का घेतला नाही याविषयी विचारले असता, त्यांनी कधीच त्याचे उत्तर दिले नाही’, असेही पटेल यांनी सांगितले. पवारांनी तेव्हा ते धाडस केले असते, तर आज देशातले आणि राज्यातले राजकारणही वेगळे असते, असे पटेल म्हणाले.

२००४ मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी प्रफुल पटेल आग्रही, पण मी नकार दिला ; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘ती खंत आजन्म राहील’

त्या घटनेविषयी शरद पवार यांच्या मनात खंत आहे की नाही ते ठाऊक नाही, पण माझ्या आणि पवारांवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ती खंत आजन्म राहील. महाराष्ट्रातला एक मोठा नेता, आमचा नेता पंतप्रधान होऊ शकला नाही, अशी सल प्रफुल्ल पटेल यांनी बोलून दाखवली. पवार यांनी अनेकदा राजकारणात ठाम भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आज अशी वेळ आली आहे, असेही पटेल यावेळी म्हणाले.