विनोद निकोले यांचे मत भाई जयंत पाटलांना मिळाले नाही, शेकाप नेत्यांना धक्का

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या आज मध्यवर्ती समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत निवडणुकीत नक्की काय झाले याचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मतही जयंत पाटील यांना ठरल्याप्रमाणे न पडल्याने एकंदरच सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

आजवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो वा भारतीय कम्युनिस्ट पक्ष असो या पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते सर्वोच्च नेत्यापर्यंत प्रत्येकाला पक्षादेश हा अंतिम असतो. कम्युनिस्ट लोकप्रतिनिधी व इतर लोकप्रतिनिधींच्या जीवनमानातही त्यामुळेच लक्षणीय बदलही दिसतात. अगदी संसदेतीलही कम्युनिस्ट पक्षांचे खासदार हे अत्यंत साधे राहात असल्याचे चित्र दिसते.
शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला? कुणी केला? १२ मतांच्या ४ शक्यता

आमदार विनोद निकोले यांचे मत जयंत पाटील यांना देण्याचे ठरले होते, पण ऐनवेळी गडबड झाली?

पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांना मिळणारा भत्ता देखील पक्षाकडे जमा करतात व पक्ष पूर्णवेळ कार्यकर्त्याला जे महिन्याचे मानधन देतात तोच खर्च करतात. कम्युनिस्ट कार्यकर्त्याला पक्षाचा सक्रीय सदस्य झाल्यापासून जो जिवन दृष्टीकोन दिला जातो त्यामुळे हे कार्यकर्ते बहुतांशवेळा पक्ष निर्णयाच्या विरोधात जात नाहीत. असे असताना माकपने त्यांच्या पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांचे मत जयंत पाटील यांना देण्याचे ठरवले असताना ते मत जयंत पाटील यांना मिळाले नसल्याचा शेकापच्या नेत्यांचा अंदाज आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो, त्यातलं एक फुटलं, जयंत पाटील यांचा दावा; पवारांच्या भेटीविनाच परतले

शेकापच्या आमदाराचेही मत मिळाले नाही?

स्वतः शेकापच्या तिकिटावर निवडून आलेल्या श्यामसुंदर शिंदे यांचेही मत जयंत पाटील यांना पडले नसल्याचा पक्षाचा अंदाज आहे. मात्र तरीही ते आयत्या वेळी बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांचे मत फुटण्यापेक्षा माकपचे मत कसे काय फुटू शकते, या प्रश्नामुळे शेकापमधील ज्येष्ठ नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे समजते.

राज्यभरातून आलेले शेकाप नेते चिंतेत

आज झालेल्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पक्षाच्या जवळपास ६०-६५ नेत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.