विधानसभेला काँग्रेस मोठा भाऊ, मविआचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणाला किती जागा?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेची निवडणूकही सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या दृष्टीनं महाविकास आघाडीनं जागावाटपाची चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला ४ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याआधी तयारीला वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर उरकण्याची महाविकास आघाडीची योजना आहे. मविआचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेसेना महाविकास आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. त्यांनी सर्वाधिक २१ जागा लढवल्या. त्यातील ९ जागांवर त्यांना यश आलं. काँग्रेसनं पडती बाजू घेतली. त्यांनी १७ जागा लढवल्या. त्यातील १३ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. तर सांगलीत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील निवडून आले. तिकडे ठाकरेसेनेचा उमेदवार होता. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं १० जागा लढवत ८ निवडून आणल्या. मविआत सर्वाधिक स्ट्राईक रेट त्यांचाच होता.
Devendra Fadnavis: अजितदादांना धक्का, शिंदेसेनेला वाटा; विधानसभेसाठी भाजपचा प्लान ठरला? फडणवीसांनी गणित मांडलं
लोकसभेत राज्यात एक नंबरवर राहिलेली काँग्रेस विधानसभेला मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष १०० ते १०५ जागांवर लढू शकतो. ठाकरेसेना ९० ते ९५ आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’नं आघाडीच्या संभाव्य जागावाटपाबद्दलचं वृत्त दिलं आहे. शनिवारी मविआची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेपूर्वी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यात जागावाटपाबद्दल प्राथमिक चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांची ताकद आहे याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर करणार आहे.
ठाकरेसेना विधानसभा स्वबळावर लढणार? संपर्कप्रमुखांना सूचना; ‘त्या’ प्रश्नानं सस्पेन्स वाढला
कोणाला कुठे अधिक जागा?
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. तर कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाताली काही भागांमध्ये ठाकरेसेनेचं वर्चस्व आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठा जनाधार आहे. त्याप्रमाणे जागावाटप होईल.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन मविआमध्ये सांगलीवरुन सुंदोपसुंदी पाहायला मिळाली. तशा चुका टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. निवडून येण्याचा निकष ठेवूनच जागावाटप करण्याचा आघाडीचा प्रयत्न असेल. तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगला समन्वय राखून प्रचार केला होता. आता विधानसभेची निवडणूक अधिक समन्वयानं लढवण्याचा निर्धार तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.