‘वास्तव’ हाती आले हो, सगळेच अवघड झाले हो! राज्यात वाढली भाजपची चिंता; विधानसभेतही फटका?

मुंबई: महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. त्या अनुषंगानं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र, हरयाणात ४ महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुका भाजपासाठी चिंतेचा विषय ठरणार आहेत. दोन्ही राज्यांत भाजपची सरकारं आहेत. महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आहे. राज्यात भाजपला बराच संघर्ष करावा लागत आहे. भाजपनं लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे.
महायुतीत खटपट विधानसभेच्या जागावाटपाची; फडणवीसांची आवडती टर्म ठरणार महत्त्वाची; सूत्र काय?
महाराष्ट्र, हरयाणात भाजपकडून विजयाचा दावा केला जात आहे. पण दोन्ही राज्यांत परिस्थिती पक्षासाठी आलबेल नसल्याचं वास्तव भाजप नेतृत्त्वाला कळून चुकलं आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. युतीमधील घटक पक्षांविरोधात नाराजीची लाट आहे. आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर भाजपची कामगिरी चांगली असेल, पण मित्रपक्षांमुळे राज्यात फटका बसेल, असं भाजपला वाटतं. मित्रपक्षांची कामगिरी सुमार झाल्यास राज्यातील एनडीएचं संख्याबळ घसरेल. गेल्या निवडणुकीत एनडीएनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या.
महत्त्वाची योजना गुंडाळली, निकालाआधीच भाजपमध्ये हालचाली; लवकरच मोठे फेरबदल, अनेकांना नारळ
महाराष्ट्र, हरयाणातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपकडून मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. सत्ता राखण्यासाठी भाजपकडून महत्त्वाची पावलं टाकली जाऊ शकतात. झारखंडमध्येही याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे.

भाजपला कोणत्या राज्यांमधून खास, कुठे होणार घात?
भाजप नेत्यांचे अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहील. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला फायदा होऊ शकतो. तर महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणात फटका बसण्याचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये होणाऱ्या नुकसानाची भरपाई पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, तेलंगणातून होईल, असा भाजपचा अंदाज आहे.