लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, एसी लोकलबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनला दिवसेंदिवस प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक प्रवासी आपला प्रवास सुखकर होण्यासाठी तसंच उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी एसी लोकल ट्रेनचा प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देतात. मात्र सर्वसामान्य ट्रेनच्या तुलनेत एसी ट्रेनचं तिकीट अधिक असल्याने अनेकजण विनातिकीट घुसखोरी करत एसी ट्रेनने प्रवास करताना दिसतात. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा तसंच अडचणींचा सामना करवा लागतो. यासाठी मध्ये रेल्वे टास्क फोर्सने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवर दररोज ६६ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. यातून जवळपास ७८ हजार ३२३ प्रवासी दररोज प्रवास करतात. वाढत्या तापमानामुळे, उन्हामुळे एसी ट्रेनच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या एसीमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. एसी ट्रेनमधून अशा विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने आता मोठं पाऊल उचललं आहे.
Hingoli News : मनात जिद्द ठेवून आईने पास केली बारावीची परीक्षा, लेकीसोबत एकत्र मिळवलं घवघवीत यश
मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक व्हॉट्सअॅपवर हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मेसेज करुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार करता येणार आहे. तिकीट काढून एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सेंट्रल रेल्वेने एका स्पेशल मॉनेटरिंग टीमची स्थापना केली आहे.

७२०८८१९९८७ या क्रमांकावर मेसेज करुन प्रवासी विनातिकीट प्रवाशांची, अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास तक्रार करू शकतात. या क्रमांकावर केवळ मेसेज करुन तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनेटरिंग टीम साध्या वेशात येऊन कारवाई करेल. त्वरीत तक्रारीचं निवारण न झाल्यास दुसऱ्या दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.