लवकर येतो, बायकोला फोन; काही वेळातच अनर्थ, घाटकोपर दुर्घटनेत बाबा गेले, लेकरांचा आक्रोश

मुंबई: घाटकोपर येथे सोमवारी सायंकाळी एक विशाल होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर जखमींचा आकडा हा ८८ च्या वर गेला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांचा दोष काय होता, असा प्रश्न आता त्यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी बाप तर कोणी पती. पूर्णेश जाधव हे देखील त्यापैकीच एक. पूर्णेश जाधव (वय ४५) यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

पूर्णेश हे सीएनजी भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर थांबले होते. त्यांना काय माहिती होतं की तिथे मृत्यू त्यांची वाट बघत होता. त्यांनी पत्नीला फोन करुन विचारणा केली, घरी लवकर येतो सांगतिलं. मग, काहीच वेळात जे घडलं त्याचा त्यांनी कधी विचारही केला असेल. पेट्रोल पंपावर अशा पद्धतीने त्यांना जीव गमवावा लागेल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. पत्नी आणि मुलांचा आक्रोश पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले.
थरथरते पाय, डोळ्यात आसवं, चेहऱ्यावर हतबलता; मृतदेह ताब्यात घेताना कुटुंबीय हेलावले

पाच लाखांची मदत कशी पुरणार?

ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे पूर्णेश जाधव ४५ वर्षांचे होते. ते टुरिस्ट ड्रायव्हर होते. सोमवारी संध्याकाळी ते गाडी घेऊन दादरला गेले. तिथून ठाण्याला येताना सीएनजी भरण्यासाठी थांबले होते. त्यापूर्वी त्यांनी घरी फोन करून पत्नीकडे विचारपूस केली. लवकर घरी येतो सांगून फोन ठेवला. पण आली ती पूर्णेश गेल्याची बातमी. मूळचे रायगडचे असलेल्या पूर्णेश यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी फोन करून राजावाडी रुग्णालयामध्ये या, असे सांगितले. मध्यरात्रीपासून थांबलेल्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह पाहून धक्काच बसला. गाडीचालक असलेल्या पूर्णेश यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे काय होणार? सरकारने पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. ती किती दिवस पुरणार, असा प्रश्न त्यांच्या चुलत भावाने उपस्थित केला.