रुग्णवाहिका येतेय, अर्धा तास द्या; अश्विनीचा मृतदेह ठेवण्यास ससून रुग्णालयाचा नकार अन् आता..

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर येथे विशाल अगरवाल या शहरातील बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने धडक देत दोन तरुणांचा जीव घेतला. यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासाला गती मिळाली असून पोलिसांनी ससून रुग्णालयात ससून रुग्णालयातली फॉरेन्सिक लॅबच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या दोघांनी अल्पवयीनच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

याविषयी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी ससून रुग्णालयावर मोठा आरोप केला आहे. या घटनेतील मृत व्यक्ती अश्विनी कोस्टाचा मृतदेह अर्धा तास जास्त रुग्णालयात ठेवण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. आता याच रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची फेरफार केल्याचं समोर आलं आहे.

काय म्हणाले रविंद्र धंगेकर?

पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या २ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता.

याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता.

असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येतील.