मोदींना पाडण्यासाठी भाजप नेत्यांचा कट होता का? रामदास कदमांनी संदर्भ सांगितला; विधानानं खळबळ

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी भाजपमधल्याच काही नेत्यांची कट रचला होता, असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम भाजपला लक्ष्य करत आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात आयोजित मेळाव्यातही त्यांनी लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरुन भाजपवर शरसंधान साधलं होतं.

भाजपच्या जागा दीड महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत लढवलेल्या जागांवर त्यांनी उमेदवार जाहीर केले. भाजपच्या या जागांवर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यानं दावा केला नाही. पण एकनाथ शिंदेंनी जागा जाहीर करताच ही जागा आमची, ती जागा आमची असे दावे भाजपकडून करण्यात आले. आम्हाला सर्वेक्षणांचे दाखले दिले गेले. मी आता त्या सर्व्हेंचा तपास करणार आहे? हे सर्व्हे केले कोणी? भाजपचे उमेदवार जिथे पराभूत झाले तिथे सर्व्हे झाले नव्हते का? या सगळ्या गोष्टी मी शोधून काढणार आहे. यांना (भाजपला) मी सोडणार नाही, असं कदम म्हणाले. ते मुंबई तकशी बोलत होते.
लोकसभेला फटका, विधानसभेसाठी महायुती सावध; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
कल्याण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गवर भाजपनं दावा सांगितल्यानं आमच्या ४-५ जागा कमी झाल्या. एक-एक खासदार कसा वाढेल आणि मोदींना कशी मदत मिळेल हे पाहणं भाजपची जबाबदारी होती. मग मोदींना पाडण्याचं कटकारस्थान होतं का? भाजपच्याच नेत्यांकडून हे कारस्थान रचण्यात आलं होतं का? असंही मी म्हणू शकतो, अशा शब्दांत कदमांनी भाजपला लक्ष्य केलं.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं. चारशे पार जायचं अशी रणनीती होती. मग तुम्ही शिवसेना आणि तुमच्या जागा एकाचवेळी का जाहीर केल्या नाहीत? शिंदेंनी जागा जाहीर केल्यानंतर ही जागा आमचीच असे दावे का केले? असे प्रश्न कदमांनी उपस्थित केले. श्रीकांत शिंदे कल्याणचे दोन टर्मचे खासदार राहिले आहेत. ती जागा भाजपनं मागितली. ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. शिंदेंची जागा फडणवीस जाहीर करतात. यामागचा हेतू काय? तुम्हाला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं नव्हतं का? भाजपच्या काही नेत्यांचा तसा हेतू होता का?, अशी प्रश्नांची सरबत्ती कदमांनी केली.