मुजोर रिक्षाचालकांना दणका, मुंबईत भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार चालकांवर कारवाई

मुंबई : रेल्वे स्थानके, मॉल, बसस्थानके व इतर ठिकाणी जवळचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३,२६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक नजीकचे भाडे नाकारतात. अशा अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे वेगवेगळ्या माध्यमातून येत होत्या. त्याचबरोबर चालक गणवेश परिधान करीत नाहीत, बॅच तसेच इतर कागदपत्रे बाळगत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात अशाही तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत बेशिस्तचालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८ एप्रिल ते २२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली.

परभणीत मध्यरात्री राडा! शिवसैनिकांनी महादेव जानकरांची गाडी अडवली, पीए अन् ड्रायव्हरला धमकावलं

तक्रारी येत असलेली ठिकाणे पोलिसांनी जाणून घेतली. या सर्व ठिकाणी १५ दिवसांत वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. रिक्षाचालक भाडे नाकारताना दिसल्यास त्याच ठिकाणी चालकावर कारवाई करण्यात येत होती. १५ दिवसांत ३,२६५८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. विनागणवेश ५२६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८६५० व इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६१३ अशा एकूण ५२१८९ इ -चलान कारवाई करण्यात आली. नाकारणाऱ्या ३२६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.