मुंबईसह उपनगरात दिवसभर मुसळधार, रविवारी कशी असेल पावसाची स्थिती?

मुंबई : मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर, पनवेल या उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि परिसरात, मुंबईच्या सखल भागांमध्ये सततच्या पावसामुळे पाणी साचलं आहे. अंधेरी, दहिसर या भागात पाणी साचलं असून अंधेरीतील सबवेमध्ये पाणी साचल्याने सबवे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत धुवांधार

मुंबईसह उपनगरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागत आहे. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून शनिवारी संध्याकाळपर्यंत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
Raigad News : पुण्यात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वरंध घाट ३१ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद

रविवारी काय असेल पावसाची स्थिती?

आज शनिवारी कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रावर ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून शनिवारी मुंबईला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला होता. तर शनिवारी दुपारी दिलेल्या पूर्वानुमानानुसार रविवारी मुंबईत यलो अलर्ट असेल. मुंबईत पुढील जवळपास ३६ तास २०० मिलीमीटर इतका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, येत्या आठवड्यात राज्यभर, सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या अर्थात रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसंच कोल्हापूर, सातारा, घाट परिसरातही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील ७२ तासांत मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील विविध राज्यांमध्ये हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आज शनिवारी, हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट दिला होता. पुणे, साताऱ्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर विदर्भात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. दरम्यान मुंबई, तसंच उपनगरातील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं आहे. अशा पाण्यातून वाटसरुंना जावं लागत असल्याचं चित्र आहे.