मुंबईत फ्लेमिंगोच्या धडका वाढल्या, विमानाला धडकून ३९ पक्ष्यांचा मृत्यू; कोणती गोष्ट कारणीभूत

मुंबई : ‘फ्लाय एमिरेट्स’ कंपनीचे विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच रोहित पक्ष्यांचा थवा विमानमार्गात आडवा आला. त्यामुळे विमानाच्या धडकेत ३९ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विमान सुमारे दीड हजार फूट उंचीवर असताना हा प्रकार घडला. सुदैवाने विमान ३१० प्रवाशांसह सुखरूप विमानतळावर उतरले.‘फ्लाय एमिरेट्स’ कंपनीचे ‘ईके ५०८’ विमान दुबईहून सोमवारी रात्री ८.४१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. सर्व प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर, विमानाला पक्ष्यांची धडक लागल्याचे हवाई नियंत्रण कक्षाला (एटीसी) कळविण्यात आले.

‘वैमानिकाकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले. त्यांनी विमानतळाच्या बाहेरील बाजूने तपास सुरू केला. त्याचवेळी एमिरेट्स कंपनीने तातडीने या विमानाचे पुढील उड्डाण रोखले. कंपनीचे अभियंतेही दुबईहून बोलाविण्यात आले असून, त्यांच्याकडून विमानाचा तपास सुरू करण्यात आला,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी; काय आहे नेमकी पळवाट? महत्त्वाचे ठरणार ‘ते’ १५ तास

एटीसीशी संबंधित सूत्रांनुसार, पक्षी धडकणे ही हवाई क्षेत्रासाठी अपघाताची बाब ठरत नाही. अनैसर्गिक घटना घडल्यास तो अपघात म्हणून गणला जातो. पक्षी धडकणे हे अनैसर्गिक नसल्याने त्याबाबतची सूचना एटीसीकडून नागरी हवाई वाहतूक संचालनालयाला (डीजीसीए) नियमित कळविली जाते. यानुसार जानेवारी २०१८ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधित अशा तब्बल ६०० घटनांची नोंद मुंबई एटीसीकडे वैमानिकांनी नोंदवली असून त्याची सूचना डीजीसीएला देण्यात आली आहे.

पक्षी धडकण्याच्या या घटना डीजीसीएकडे आल्यानंतर डीजीसीएकडून संबंधित विमानतळाला उपाययोजना करण्यास सांगितले जाते. मुंबई विमानतळाच्या एका बाजूला खाडी असल्याने तेथे रोहितसारख्या पक्ष्यांचा वावर कायम असतो. यामुळे मुंबईच्या विमानतळासाठी ही दैनंदिन बाब आहे. त्याचा दैनंदिन अहवाल विमानतळाकडून डीजीसीएला दिला जातो. डीजीसीएने दिलेल्या सूचनांवर विमानतळाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Kalyaninagar Accident: पुणे पोर्शे कार अपघात: मुलाचा जामीन धक्कादायक, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

– विमानतळाजवळील मांसाहारी कचरा ठरतो कारणीभूत

– एका बाजूला खाडी असल्याने रोहित पक्ष्यांचा वावर

– डीजीसीएकडून वेळोवेळी उपाययोजनांच्या सूचना

उघड्यावरील कचरा धोकादायक

विमानतळ धावपट्टीच्या पूर्वेकडे जरीमरी, बैल बाजार, शास्त्रीनगर या भागात अनेक मांसाहाराची दुकाने विमानतळाच्या संरक्षक भिंतीपासून जेमतेम ५० मीटर अंतरावर आहेत. काही दुकाने उघड्यावर आहेत. ही दुकाने त्यांचा मांसाहाराचा कचरा अनेकदा तेथेच उघड्यावर टाकतात. त्याकडे पक्षी आकर्षित होऊन ते विमानांना अडथळा ठरतात असे दिसून येते. हा अडथळा दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाला अनेकदा सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळ सुरक्षा समितीच्या बैठकीतही अशी सूचना दिली जाते. मात्र ठोस व कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.