मुंबई विद्यापीठाचा जलतरण तलाव ‘खड्ड्यात’; १.३८ कोटी रुपयेही पाण्यात, १५ वर्षांनंतर काम पूर्णत्त्वास जाणार

रोहन टिल्लू, मुंबई : विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागांतर्गत येणारा जलतरण तलाव गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत असून या तलावाच्या कामापोटी खर्च केलेले १.३८ कोटी रुपयेही पाण्यात गेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठाने मार्च २००६मध्ये या तलावाच्या कामाची निविदा काढताना त्यात योग्य तपशीलच नमूद न केल्याने जलतरण तलाव तर बांधला, पण त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असलेल्या फिल्टरेशन प्लांटचे नियोजनच झाले नव्हते. आता या तलावाच्या खड्ड्याने १५ पावसाळ्यांचे पाणी पचवल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने जलतरण तलावाचे काम पूर्णत्त्वास नेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मंजुरीही मिळाली असून लवकरच वास्तुविशारद नेमला जाईल.

मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाची स्थापना २००५-०६ या वर्षी झाली. विद्यापीठाच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २००६ मध्ये नियोजन आयोगाने विद्यापीठाला २० कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी साडेसहा कोटींच्या निधीतून ५९ हजार ५०० चौरस फुटांच्या विस्तीर्ण जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात आले. या संकुलात जलतरण तलाव असावा, या विचाराने १७ मार्च, २००६च्या कार्यादेशान्वये तलावाचे काम सुरू झाले.

त्रुटी काय राहिली?

कोणताही जलतरण तलाव उभारताना तलावासोबतच पाणी गाळण्याचा फिल्टरेशन प्लांटही बांधावा लागतो. या प्लांटमध्येच पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण ठरते. त्याशिवाय तलावासाठीची विद्युत सुविधाही करावी लागते. मुंबई विद्यापीठाने २००६मध्ये जे काम केले, त्या कामाच्या तपशीलात फक्त जलतरण तलाव बांधण्याचाच उल्लेख होता. पण फिल्टरेशन प्लांट आणि विद्युत सुविधा यांचा विचारच झाला नाही. त्यामुळे २००८मध्ये हे काम अर्धवट अवस्थेत थांबवण्यात आले.

१६ वर्षांची प्रतीक्षा

२००८पासून विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या मागच्या बाजूला जलतरण तलावाचा खड्डा असाच आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते. तसेच त्याच्या आजूबाजूला झाडेझुडुपे वाढलेली असतात. विद्यापीठाने हा तलाव पूर्णत्त्वास नेण्याचा विचार याआधीही केला होता. मात्र तलाव बांधण्याचा खर्च खरेच व्यवहार्य आहे का, हा प्रश्न होता. त्यामुळे गेली १६ वर्षे विद्यापीठातील जलतरणपटूंना या तलावाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

‘दीड कोटी पाण्यात’

नियोजन आयोगाकडून आलेल्या २० कोटींपैकी दीड कोटी विद्यापीठाने या जलतरण तलावाच्या नावाने खड्ड्यात टाकले. खरे तर या तलावाचे कंत्राट काढताना त्याच्या तपशीलात चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्याच वेळी कारवाई व्हायला हवी होती. विद्यापीठाने तातडीने ती चूक दुरुस्त करून या तलावाचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. पण आपल्या लौकिकाला जागत विद्यापीठाने १६ वर्षांचा कालावधी घेतला, अशी प्रतिक्रिया माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली आहे.

लवकरच काम पूर्ण होईल

विद्यापीठातील खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही नेहमीच बांधील आहोत. या जलतरण तलावाबाबतही आम्ही तज्ज्ञांची समिती नेमली होती. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर व्यवस्थापन परिषदेत या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता जलतरण तलावासाठी वास्तुविशारदाची नेमणूक प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.