मी दारू पितो आणि गाडी चालवता येत नाही, हे वडिलांना माहिती होतं, लेकाने वडिलांचाच पंचनामा केला

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवीन घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण आता वेग धरत आहे. आरोपी अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यापासून त्यावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपीच्या कबुलीमुळे वडिलांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच पब चालकावरही कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाने सांगितल्यानुसार, तो १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला मित्रांसोबत पार्टी करायची होती. हे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याच्या वडिलांनीच त्याला पार्टीला जाण्यासाठी त्यांची पोर्श कार दिली होती. त्याला दारू पिण्याची सवय आहे आणि गाडी नीट चालवताही येत नाही हेही वडिलांना माहीत होते, अशी माहिती मुलाने दिली आहे.ही घटना गेल्या शनिवारी घडली. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने आयटी इंजिनिअर मुला-मुलींना गा़डीने उडवले होते. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत होता. त्याच्या वडिलांची पोर्श कार ताशी २०० किमी वेगाने चालवत होता. अपघातात जीव गमावलेला अनिश अवधिया हा मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बिरसिंगपूरचा रहिवासी होता आणि अश्विनी कोष्टा ही मुलगी जबलपूरची रहिवासी होती. या घटनेनंतर मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र अवघ्या १५ तासात न्यायालयाने आरोपीला काही अटींवर जामीन मंजूर केला. त्यानंतर विविध प्रश्न उपस्थित झाले होते.
Pune Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट, कोझी पबच्या मालकावर कारवाई, २४ मे पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
मात्र, कोर्टातून जामीन मिळण्यापूर्वी पोलिसांनी अपघाताबाबत आरोपीची चौकशी केली असता, आरोपीनी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “१२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला मित्रांसोबत पबमध्ये पार्टी करण्याची परवानगी दिली होती. त्याने गाडी चालवण्याचे योग्य प्रशिक्षणही घेतले नव्हते. तरीही, त्याच्या वडिलांनी त्याला पार्टीला जाण्यासाठी त्याची पोर्श कार दिली. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. त्याने दारू प्यायल्याचे वडिलांनाही माहीत होते. आरोपी मुलाच्या या कबुलीनंतर वडील विशाल अग्रवाल हा फरार झाला असून त्याला पोलिसांनी मंगळवारी संभाजीनगर येथून अटक केली. प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार मॅनेजर जयेश बोनकर यांच्यावरही बार आणि पबमध्ये अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी पोलीस यंत्रणेच्या कारभारावर आक्षेप घेत पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली. दुसरीकडे अवघ्या १५ तासांत तरुणाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या निर्णयाने सोशल मीडियावर आणि इतरत्र टीकेचे वादळ उठले आहे.