मान्सूनची दोन जुलैची ‘हॅट्ट्रिक’, तर पोलिसांसाठी नवा नियम बंधनकारक; सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. मान्सूनची दोन जुलैची ‘हॅट्ट्रिक’

नैर्ऋत्य मान्सूनने नियमित तारखेच्या सहा दिवस आधी संपूर्ण देश व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनने दोन जुलैला संपूर्ण देश व्यापला. मान्सूनने संपूर्ण देश व्यापण्याची सर्वसाधारण तारीख आठ जुलै आहे.

२. मिलिंद नार्वेकरांनी दरवाजा ठोठावला अन् गणित बदललं

विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची आज, बुधवारी छाननी होणार असून, ५ जुलैला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने निवडणुकीची गणिते बदलली आहेत.

३. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकरावा

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात अकराव्या स्थानी असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) दिलेल्या माहितीच्या आधारे केला. या आकडेवारीवरून चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सुधारणा करण्याची मागणी केली.

४. बहिणीकडूनच ‘लाडक्या बहिणीं’ची लूट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू अधिवेशनात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा करताच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब गरजू महिलांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात येणाऱ्या महिलांची लूट करण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, या दलालांमध्ये महिलांचाच भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

५. कोकणकरांच्या कामाची बातमी

गणरायाच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या ४ जूलैपासून खुले होणार आहे. समूह आणि वैयक्तिक आरक्षणासह परतीचे आरक्षणही प्रवाशांना गुरुवारपासून करता येणार आहे.

६. पोलिसांसाठी नवा नियम बंधनकारक

एखाद्या गुन्ह्याची तक्रार घेताना तक्रारदाराच्या लेखी तक्रारीसह त्यांचे म्हणणे ‘यथार्थ डिव्हाइस’मध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून घेणे, पोलिसांना आता बंधनकारक असणार आहे. रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची ‘हॅश व्हॅल्यू’ प्राप्त करून तो व्हिडिओ पेन ड्राइव्ह, सीडी किंवा अन्य ठिकाणी जतन करून ठेवावा लागणार आहे.

७. वसई परिसरातील पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई

पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या वसईतील तुंगारेश्वर आणि चिंचोटी पर्यटन स्थळावरील अपघात प्रवण क्षेत्र, पाण्याचा प्रवाह यामध्ये वनविभागातर्फे पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक दुर्घटना या याच दोन ठिकाणी होत असल्याने या भागातील काही क्षेत्रात जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.

८. माझ्या पोरीची बॉडी काढायला मदत करा!!!

हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावात भोला बाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन ११६ भाविक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुसंख्य महिला आणि बालके आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह बहुतेक नेत्यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

९. मेटा, गूगलसह बड्या कंपन्यांना ८३०० कोटींचा गंडा

भारतीय मूळचे अमेरिकन उद्योगपती आणि शिकागो-स्थित हेल्थकेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे सहसंस्थापक ऋषी शाह यांना एक अब्ज डॉलर्सच्या फसवणूक प्रकरणी एका यूएस न्यायालयाने साडेसात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ऋषी यांना यूएस जिल्हा न्यायाधीश थॉमस डर्किन यांनी आरोग्यसेवा जाहिरात स्टार्टअप आउटकम हेल्थच्या फसवणूक योजनेत मुख्य भूमिकेच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक आणि इलिनॉयचे गव्हर्नर जेबी प्रित्झकर यांच्या व्हेंचर कॅपिटल फर्म यासारख्या उच्च-प्रोफाइल गुंतवणूकदारांची या फसव्या योजनेद्वारे फसवणूक करण्यात आली.

१०. आयपीएलच्या नियमात बदल होणार?

आयपीएलच्या पुढील हंगामात म्हणजे २०२५साठी मेगा लिलाव होणार असून त्यात काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. फ्रँचायझींनी पुढील तीन हंगामांसाठी जास्तीत जास्त खेळाडूंना कायम ठेवण्याची विनंती केली आहे. जरी सर्व प्रत्येक फ्रँचायझी वेगवेगळ्या उद्दिष्टांनी काम करत असेल तरी हा निर्णय सगळ्या फ्रँचायझीने एकत्र घेतला आहे.मागील हंगामाच्या तुलनेत अधिक खेळाडू फ्रँचायझींना राखीव म्हणून ठेवायचे आहे.