मागेल त्याला तिकीट, वंचितवर ११ जागी उमेदवार बदलण्याची नामुष्की, सहा ठिकाणी बिनशर्त पाठिंबा

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे महिनाभर चर्चा केल्यानंतर अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीवर आतापर्यंत राज्यात ११ जागांवरील उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे, तर पक्षाने स्वतःहून सहा जागांवर इतर उमेदवारांना पाठिंबा दिला असून, त्यातील एका जागेवर तर उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे.

‘वंचित’ने आतापर्यंत ३६ जागांवर उमेदवार जाहीर केले असून, इतर सहा जागांवर इतरांना पाठिंबा जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या जागांवर तब्बल ११ जागांवर उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. सोमवारीच पक्षाने बीना सिंह यांना उत्तर मुंबईची दिलेली उमेदवारी रद्द करून, सोनल गोंडाने यांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून संजीवकुमार कलकोरी यांच्याजागी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी देण्यात आली. मुंबई उत्तर-मध्य जागेवरून अबूल हसन यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली.

रामटेक लोकसभा मतदासंघात ‘वंचित’ने शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही भरला होता; मात्र अचानक पक्षाने त्यांना माघार घेण्यास सांगून, त्याच जागेवर पक्षातून इच्छुक असलेले किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्यास सांगितले. अपमानित झालेल्या चहांदे यांनी ‘वंचित’ला सोडचिठ्ठी देऊन, काँग्रेसची वाट धरली.

यवतमाळ-वाशिममध्ये तर पक्षावर वेगळीच नामुष्की ओढवली. पक्षाने खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, पवार यांनी माघार घेतल्यावर ऐनवेळी अभिजित राठोड यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र, अर्ज छाननीदरम्यान राठोड यांचा अर्ज बाद झाल्यावर पक्षाला अखेर समनक जनता पक्षाच्या अनिल राठोड यांना पाठिंबा द्यावा लागला.

जळगाव मतदारसंघातून पक्षाने प्रफुलकुमार लोढा यांना ‘वंचित’ने उमेदवारी जाहीर केली; मात्र लोढा यांनी आपल्या उमेदवारीमुळे भाजपला थेट फायदा होण्याची शक्यता आहे, असे सांगून माघार घेतली. त्याजागी पक्षाने युवराज जाधव यांना उभे केले. दुसरीकडे सोलापूरमध्ये राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती; मात्र त्यांनी माघार घेतल्याने अखेर पक्षावर अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की आली. मुंबईतील सहापैकी चार जागांवर पक्षाने उमेदवार घोषित केले असून, त्यातील तीन जागांवरील उमेदवार बदलले आहेत.
शांतिगिरी महाराजांचा नाशिक लोकसभेसाठी अर्ज, पक्षाच्या नावापुढे शिवसेना लिहिल्याने संभ्रम

मागेल त्याला तिकीट

पक्षाकडून लोकसभा लढविण्यासाठी उमेदवारच मिळत नसल्याने जो कोणी इच्छुक पक्षाशी संपर्क करील त्यांना तिकीट मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याविषयी पक्षाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पक्षातील एका नेत्याने याविषयी बोलताना सांगितले, ‘उमेदवारी मागताना अनेक मोठे दावे केले जातात; परंतु जेव्हा निवडणूक पुढे जाते तसे विविध दबावांना उमेदवार बळी पडतात. एका प्रकरणात एक उमेदवार प्रलोभनासही बळी पडला आहे. त्यामुळे शक्य असेल तर तत्काळ उमेदवारी बदलण्यात येते.’
काँग्रेस सोडली, वंचितकडून तिकीट, शिर्डीत ट्विस्ट आणणाऱ्या उत्कर्षा रुपवते जरांगेंच्या भेटीलाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

सहा ठिकाणी बिनशर्त पाठिंबा

‘वंचित’ने नागपूर, कोल्हापूर येथे काँग्रेसला, तर बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला. भिवंडीमधे नीलेश सांबरे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती येथे रिपब्लिकन सेना आणि यवतमाळ-वाशिम येथे समनक जनता पार्टी यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.