भाजपला शिंदे-अजितदादांचा राजीनामा हवाय? फडणवीसांच्या ‘नैतिक दबावा’च्या नाटकाचा आरोप

प्रतिनिधी, मुंबई :‘भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मीच राजीनामा देतो,’ असे नाटक सुरू करून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे व पवार यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा डाव टाकला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

‘भाजपला शिवसेना व राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही, महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले हे लक्षात आल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी सुरू केली आहे,’ असा आरोप तपासे यांनी केला. ‘आता भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी नकोशी झाली असून, त्यांचा राजीनामा घ्यायचा असल्यानेच हे नाट्य वठवले जात आहे,’ असा दावा तपासे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या यशाबद्दल बोलताना तपासे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘अजित पवार हे शरद पवार यांना घरी बसून मार्गदर्शन करण्याचे सुचवत होते; परंतु ८४ वर्षांच्या योद्ध्याचा स्ट्राइक रेट ८० टक्के असल्याचे दिसून आले, तर ४० आमदार सोबत असलेल्या अजित पवारांना एकच खासदार निवडून आणता आला,’ अशीही टीका तपासे यांनी केली.
Kirit Somaiya : आम्ही बांगलादेशींमुळे हरलो, आकडे दाखवत ठाकरेंच्या सेनेवर घाव, सोमय्यांचा रडीचा डाव

‘फडणवीस यांच्याशी बोलणार’

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या, तरी मी याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही, तर विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे दिली.

फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. मतांची टक्केवारी पाहिली, तर मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. ‘राज्यघटना बदलणार’ हे विरोधकांनी ‘खोटे बोला, पण रेटून बोला’ या उद्देशाने तात्पुरते तयार केलेले नॅरेटिव्ह आहे. ‘मोदी हटाव’ असा नारा विरोधक देत होते. मात्र, मतदारांनी त्यांना तडीपार केले. मोदींकडे विकासाचा अजेंडा आहे,’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Udayanraje : पंकजा मुंडे निवडून न आल्यास मी राजीनामा देईन… उदयनराजेंच्या आवाहनाची सोशल मीडियावरुन आठवणRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

‘पराभवाची कारणमीमांसा केली जाईल. गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या असतील, तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले,’ असेही ते म्हणाले.