पक्षात असताना सख्खा भावाचं नातं, पक्ष सोडल्यावर पक्के वैरी, धमकी कुणी दिली? वसंत मोरेंनी नावच घेतलं

पुणे: वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुण्यातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते. यानंतर आता वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे हे नेहमी त्यांच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी फेसबूक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. यासंबंधीची ऑडिओ क्लिप त्यांनी शेअर केली आहे. यात त्यांनी मनसे कार्यकर्त्याकडून धमकी आल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही, माझ्या घरावर हल्ला सहन करेल पण… इम्तियाज जलील संतापले!

नेमकं काय घडलं?

वसंत मोरे यांनी कॉलवरून ही धमकी देण्यात आली आहे. मात्र धमकी देणाऱ्याने हा कॉल त्यांना न करता त्यांच्या भाच्याला केला आहे. प्रतिक कोडितकर असं त्यांच्या भाच्याचे नाव आहे. प्रतिकला एका अज्ञात मनसे कार्यकर्त्याने फोन केला असून या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वसंत मोरे यांची विकेट पाडणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर तो म्हणाला की, तू माझी तक्रार कर. माझ्यावर आधीच्या १३ ते १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात अजून एक होईल. याने मला फरक पडणार नाही. यातून मी एखादं वर्ष तुरुंगात जाईन. पण वसंत मोरेंची मी विकेट पाडणारच… मी मनसेचा कार्यकर्ता असून मनसेचे काम करतो, असं धमकी देणाऱ्याने प्रतिकला सांगितलं आहे.त्यानंतर याची ऑडिओ क्लिप वसंत मोरे यांनी फेसबूकवर शेअर केली आहे. तसेच ही पोस्ट शेअर वसंत मोरे म्हणाले की, मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला आहे की अगदी मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले…? संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे. पाहू पोलीस आता यावर काय भुमिका घेतात, असं म्हणत वसंत मोरे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करण्याची मागणी केली आहे.


दरम्यान या प्रकरणी धमकी कुणी दिल्याचे वसंत मोरे यांना विचारले असता त्यांनी दिलेलं उत्तर हे विचारात पाडणारं होतं. या धमकीमागे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हात असल्याचे त्यांनी सांगितलं. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मनसे पक्षात असताना सख्ख्या भावाचं नातं असणाऱ्या व्यक्तीचे आता असं नाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.