तुम्ही पाण्यासाठी काय केलं? आढळरावांना तरुणाचा सवाल; जाब विचारताच नेत्यांची बोलती बंद

शिरुर: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे उमेदवार आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना एका तरुणानं पाणी प्रश्नावरुन जाब विचारला. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना आमच्या गावाला पाणी मिळावं म्हणून काय केलं याचं उत्तर द्या, असं म्हणत पाबळ (ता. शिरुर) येथील अजित जाधव नावाच्या तरुणानं माजी खासदार आढळराव पाटील यांना भरचौकात चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळालं.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पाबळ (ता. शिरुर) गावात प्रचारासाठी गेले असता त्यांना गावातील तरुणांनी घेरलं आणि पाणी प्रश्नावर आढळरावांनी त्या तरुणाचं म्हणणं ऐकून घेतलं. शिरूरच्या पाबळ परिसरातील केंदूर, पाबळसह १३ गावांचा पाणी प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही नेत्याने त्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे त्या भागातील संतप्त शेतकरी, तरुण गेल्या ४ वर्षांपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत.
…अन्यथा कारवाईस तयार राहा! भाजप नेतृत्त्वाकडून नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा; शहा ऍक्टिव्ह
शिवाजीराव आढळराव पाटील १५ वर्षे खासदार होते. त्याचबरोबर मंत्री दिलीप वळसे पाटील देखील या भागाचं प्रतिनिधीत्त्व करतात. मात्र या गावांना पाण्यासाठी सातत्यानं वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने आढळराव पाटील यांना पाबळ गावात प्रचाराला आल्यानंतर भरचौकात जाब विचारला. अमोल कोल्हे आले होते, त्यावेळीही आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला होता, असंदेखील तरुणानं आढळरावांना सांगितलं.

आम्ही तुम्हाला गेली १५ वर्षे मतदान केलं, एवढंच नाही तर वळसे पाटलांनादेखील आम्ही छातीठोकपणे मतदान करतो. परंतु तुम्ही लोकांनी आमच्या या गावांच्या पाण्यासाठी नेमकं काय केलं? कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही निवडणूक लढत आहात? अशी प्रश्नांची सरबत्तीच अजित जाधव यांनी केली. त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आढळरावांची या तरुणानं बोलती बंद केली. शेजारी उभे असलेले वळसे पाटलांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील यांनीही तरुणाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागले परंतु, त्यांनाही प्रतिप्रश्न करत वळसे पाटलांनाही आम्ही छातीठोकपणे आम्ही मतदान केलंय असं म्हणत प्रदीप वळसे पाटील यांनाही तरुणानं निरुत्तर केलं.