जुन्नरमधील बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाची खास उपाययोजना, बिबट्या दिसताच वाजणार सायरन

जुन्नर : बिबट्या मानव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘एआय’ तंत्रज्ञानाने बिबट्याचा अलर्ट देणारी प्रणाली कार्यरत करणार असल्याची माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.

गेल्या २० वर्षांपासून जुन्नर परिसरात बिबट्या-मानव संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत याची तीव्रता वाढली आहे. गेल्या चार महिन्यांत काळवाडी, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी भागात बिबट्यांच्या हल्ल्यात दोघांचा जीव गेला असून, अनेक जण गंभीर झाले आहेत. सलग घडलेल्या या घटनांमुळे लोकांमध्ये वन विभागाविषयी तीव्र असंतोष असून, त्यातून एका महिला वनरक्षकावर लोकांनी हल्ला केला होता.

‘माणिकडोहचे विस्तारीकरण करणार’

‘जुन्नर, आंबेगाव तालुक्याचा पूर्व आणि शिरूरच्या पश्चिम भागात सात ते आठ ‘हॉटस्पॉट’ निश्चित करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या जास्त आहे, तेथे उपायोजनांवर विशेष देत आहोत. नगदवाडी बेस कॅम्पवर या संदर्भातील व्यवस्था केली आहे. दरम्यान, माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात १०० बिबटे ठेवण्यासाठी विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी साडेबारा हेक्टर जागा मिळणार असून, यासाठी दीड कोटी रुपयांचा भरणा जलसंपदा विभागाकडे केला आहे. वर्षभरात निवारा केंद्राचे विस्तारीकरण करणार आहोत,’ सातपुते यांनी सांगितले.
Pune Water Crisis: पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट; टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या, पुरंदरला सर्वाधिक झळ
पिंपरी-काळवाडी परिसरातून पकडलेला बिबट्या पुन्हा तेथेच सोडला अशी माहिती पसरविल्याने लोकांचा उद्रेक झाला होता. त्यातून महिला वनरक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. वन विभागाकडून लोकांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप निराधार आहे.- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर