जरांगे साहेब आरक्षणाशिवाय मागे हटू नका, चिऊ मला माफ कर, पुण्यात मराठा आंदोलकाचा भयंकर निर्णय

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उपोषणाला सुरवात केली आहे. दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसला आहे. हे आंदोलने सुरु असतानाच आता पुण्यातील मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली आहे.

‘जरांगे साहेब मागे हटू नका’

शंभू प्रसाद देठे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने लाईव्ह आणि पत्र लिहून आत्महत्या केली आहे. हा तरुण मूळचा बार्शी येथील राहणारा असून तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. तिथेच एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या पत्रात मनोज जरांगे यांना मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका अशी विनंती केली आहे. तर, मी पूर्णपणे हताश झालो आहे, असंही तो या पत्रात म्हणाला.

‘मी हताश झालो आहे, चिऊ मला माफ कर’

“जयोस्तु मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा, तुमचाच प्रसाद”, अशा आशयाचं पत्र लिहून त्याने आपले जीवन संपवले आहे.

माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही, असा उल्लेख प्रसाद देठे याने पत्रात केला आहे. देठे याच्या पश्चात पत्नी, २ मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबंचा आधार गेला असल्याची भावना त्याच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.