चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच तुम्हाला वाघाची पदवी देऊ, संजय राऊतांचा विश्वजीत कदमांना खोचक टोला

सांगली (स्वप्नील एरंडोलीकर) : विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही, हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ, असा खोचक टोला संजय राऊतांनी विश्वजीत कदम यांना लगावला आहे. संजय राऊत सांगलीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सांगलीचा वाघ कोण? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीत वसंतदादा पाटील हे वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलेले आहेत. वाघाची रचना आणि स्वभाव वेगळा असतो. विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. त्यांनी जर चंद्रहार पाटलांना विजयी केलं तर नक्कीच आम्ही कदमांना वाघाची पदवी देऊ. अशा अनेक वाघांनी चंद्रहार पाटलांना विजयी केलं पाहिजे. मग आम्ही 4 जूनला त्या वाघांचा जाहीर सत्कार करू. जयंत पाटीलांची डरकाळी ही वाघाची डरकाळी आहे. सांगलीमध्ये मला बरेच वाघ दिसत आहेत, त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे.
शेंडगेंचा पाठिंबा काढला, विशाल पाटलांना दिला; वंचितनं निर्णय फिरवला, सांगलीत गणित बदलणार?
‘अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षांनी अनेक ठिकाणी उभे केलेत, ते कमजोर वाटत असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करतंच आहोत ना, आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही, आम्ही वाघ आहेत आम्ही त्याला पुढे घेऊन जाऊ. त्या उमेदवाराला विजयी करणं शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे.’ अशी भावना देखील राऊतांनी व्यक्त केली आहे.

सांगलीच्या संदर्भात माझी राहुल गांधींशी चर्चा झालेली आहे. विशाल पाटील यांच्यासंदर्भात दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झालेली आहे. माझ्या पद्धतीने मी चर्चा करतो, अशी माहिती देत सांगत सांगलीतील तिरंगी लढतीबाबत राऊत म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार आहेत सांगलीत. एका उमेदवाराचा प्रचार स्वत: भाजपा करतंय तर दुसऱ्या बाजूला प्रचार करण्यासाठी काही लोक नेमलेत. तरी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील.’
भाजपकडून पाकीट घेऊन विशाल पाटील निवडणूक लढवतायत, आतापर्यंत शांत असलेल्या पैलवान चंद्रहार पाटलांनी दंड थोपटले
मोदींच्या ठाकरेंविषयीच्या वक्तव्यावर प्रहार करत राऊत म्हणाले की, ‘मोदी स्वत: अडचणीत आहेत, त्यामुळे अडचणीत असलेला व्यापारी हा नेहमी खोटं बोलत असतो. जर ठाकरेंबदल प्रेमाचा बाणा असता तर मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. मोदींचं शिवसेनेवरचं प्रेम खोटं आहे.’