प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मुंबईतील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या दुर्घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं असून हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटविण्याचं काम सूरु आहे. आतापर्यंत ५७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
तसंच या दुर्घटनेतील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील. तसंच या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.दरम्यान, होर्डिंगची साईज ४० बाय ४० ची असावी असा नियम आहे, मात्र कोसळलेलं होर्डिंग हे तब्बल १०० बाय १२० असं उभारण्यात आलं होतं. अनेकजण अचानक पाऊस आल्याने होर्डिंगखाली असलेल्या शेडमध्ये उभे होते. त्याखाली अनेक गाड्यादेखील उभ्या होत्या. त्यावर हे अवाढव्य होर्डिंग कोसळलं आणि त्याखाली अनेक लोक, कार दबल्या गेल्या. आता दबल्या गेलेल्या माणसांसह कारदेखील बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.