कॅबिनेट बैठकीला गैरहजर, चहापानाला दांडी; दादांचं फूलप्रूफ प्लानिंग, काकांची चाल कशी उधळली?

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळे उमेदवार निवडून आणत महायुतीनं गुलाल उधळला आहे. अजित पवार गटाचे आमदार फुटतील, ते शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी चर्चा होती. पण तसं कही झालं नाही. अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले. अजित पवारांनी बाहेरुन ७ मतं खेचून आणली आणि शरद पवारांची खेळी निष्फळ ठरवली.

अजित पवार गटाची मतं फुटणार, दादांचे आमदार क्रॉस व्होटिंग करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे रिंगणात होते. गर्जे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार होते. क्रॉस व्होटिंगमुळे ते अडचणीत येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला. जयंत पाटील यांचे सर्वपक्षीय संबंध आणि शरद पवारांकडे परतण्यास इच्छुक असलेले दादांचे आमदार यांचा विचार करता गर्जे धोक्यात सापडतील, अशी चर्चा होती.
MLC Election 2024: …तर सातवही दुसऱ्या फेरीत गेल्या असत्या! काँग्रेसमध्ये मोठा दगाफटका, नामुष्की थोडक्यात टळली
शरद पवारांकडे परतण्याची तयारी असलेले आमदार जयंत पाटील यांना मतदान करतील असा तर्क मांडण्यात आला. विधानसभेआधी दादांचे बरेचसे आमदार माघारी परततील ही चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होती. पण लोकसभा निवडणुकीत पराभव पाहणाऱ्या अजित पवारांनी अतिशय सावध चाली रचल्या. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. या बैठकीला ते हजर नव्हते. विधानसभा अध्यक्षांनी ठेवलेल्या चहापानालाही ते अनुपस्थित होते.
MLC Election 2024: नार्वेकर जिंकले, पण ठाकरे व्हिलन ठरले; पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करुन शिंदेंनी काय काय साधले?
विधान परिषदेच्या निवडणुकीत विटेकर आणि गर्जे यांना निवडून आणण्याचा चंगच अजित पवारांनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी स्वत: रणनीती आखली. पक्षातील प्रत्येक आमदाराशी ते स्वत: बोलले. बाहेरुन कोणती मतं कशा पद्धतीनं आणायची यासाठीदेखील त्यांनी व्यूहनीती आखली. यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल त्यांच्यासोबत होते.

अजित पवारांसोबत असलेला एकही आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटला नाही. दादांसोबत असलेल्या ४० आमदारांनी पक्षाच्या उमेदवारांना मतं दिलं. दादांच्या दोन्ही उमेदवारांना एकूण ४७ मतं मिळाली. याचा अर्थ त्यांना ७ मतं अधिकची मिळाली. दुसरीकडे काँग्रेसची मतं फुटली. काँग्रेसच्या ३ ते ५ आमदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत दिल्याचं बोललं जात आहे.