अब की बार ४०० पार! भाजपवर घोषणा बाजूला ठेवण्याची वेळ; कारण ठरताहेत मित्रपक्ष

मुंबई: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातला प्रचार काल थांबला. राज्यात उद्या ११ जागांवर मतदान होईल. यातील बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहे. साखर पट्ट्यात कोणाच्या तोंडात साखर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. कोल्हापूर, हातकणंगलेत शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. राज्यात भाजप पहिल्यांदाच २८ जागांवर लढत आहे. पण मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपवर ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे.

देशभरातील मित्रपक्ष भाजपची डोकेदुखी वाढवत आहे. भाजपप्रणित एनडीएमध्ये ४० पक्ष आहेत. ते १०० जागांवर लढत आहेत. मात्र त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं भाजप नेतृत्त्वाला वाटतं. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. पैकी २० जागा मित्रपक्ष लढवत आहेत. शिंदेसेना १५, अजित पवारांची राष्ट्रवादी ४, तर राष्ट्रीय समाज पक्ष १ जागेवर लढत आहे.
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी! मतदानादिवशी प्रचिती येणार; शरद पवारांनी डाव टाकला
गेल्या निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीनं ४१ जागा जिंकल्या होत्या. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी मिशन ४५ आखण्यात आलं आहे. पण बहुतांश सर्व्हे पाहता महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा जिंकताना दिसत नाही. महायुतीला २८ ते ३० जागा मिळताना दिसत आहेत. भाजपची कामगिरी चांगली असेल, असं सर्व्हे सांगतात. पण मित्रपक्षांना फारसं यश मिळणार नाही, असे अंदाज आहेत. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.
आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करा! मिशी काढेन म्हणणाऱ्या अजित पवारांना बंधूंकडून प्रत्युत्तर
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. यापैकी २३ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. पण ते एकत्रितपणे प्रचार करु शकत नाही. लोकजनशक्ती (रामविलास) पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्यामुळे जनता दलाला बऱ्याच जागांवर फटका बसला. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणारा जनता दल ४३ जागांवर आला. त्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमारांनी पासवान यांना माफ केलेलं नाही. चिराग पासवान यांचा पक्ष ५ जागा लढवत आहे. आरएलएम आणि हम यांच्यापुढेही आव्हान आहे. जदयू लढत असलेल्या १६ जागांपैकी अनेक जागा अडचणीत आहेत.
बँक खात्यात ११ रुपये असलेले ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; ठाकरेंच्या शिलेदाराची अडचण
कर्नाटकात सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानं देवगौडा यांचा जनता दल सेक्युलर पक्ष भाजपसाठी अडचणीचा ठरत आहे. कर्नाटकात भाजपनं २०१९ मध्ये २५ जागा जिंकल्या होत्या. पण सेक्स स्कॅण्डलमुळे भाजप आणि मित्रपक्षांना फटका बसू शकतो. त्यामुळे मागील कामगिरीची पुनरावृत्ती अवघड आहे. उत्तर प्रदेशात भाजपनं मित्रपक्षांना ६ जागा सोडल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपनं उत्तर प्रदेशात ६४ जागा जिंकल्या होत्या.

आंध्र प्रदेशात भाजपला चांगल्या कामगिरीची आशा आहे. युतीतील सहकारी पक्ष एकत्र काम करत असल्यानं लोकसभेच्या २५ जागांपैकी बहुतांश जागा जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे. तमिळनाडू, केरळमध्ये यंदा खातं उघडलं जाईल असा आशावाद भाजपला आहे. आठ छोट्या पक्षांसह भाजप इथे लढत आहे.