Yugendra Pawar: विधानसभा निवडणूक लढवणार का? जनता दरबात युगेंद्र पवार यांनी पाहा काय दिले उत्तर…

बारामती (दीपक पडकर) : आता कुठे लोकसभेची निवडणूक संपली आहे. अजून निकाल येणे बाकी आहे. विधानसभेला अजून अवकाश आहे. त्यामुळे विधानसभा लढवणार की नाही याबाबत मी अद्याप विचार केलेला नाही, असे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार म्हणाले.

बारामतीत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गट कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मी सध्या कामावर फोकस करतो आहे. मी आमदारकी लढवेल असे लोक बोलत असतील. पण मी अजून त्यावर विचार केलेला नाही.

बारामतीत बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. कंपन्यांशी बोलून तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही, तेथे आमच्याकडून टॅकर दिले जात आहेत. प्रशासन काही ठिकाणी लक्ष घालतेय, काही ठिकाणी तेवढे लक्ष नसेल, त्यामुळे लोक फोन करून टॅंकरची मागणी करत आहेत. माणूसकीच्या नात्याने आम्ही ते पुरवत आहोत.

१२ तासात जामिन कसा काय मिळू शकतो…


पुण्यातील अपघाताच्या घटनेबाबत युगेंद्र पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. काही लोकांना अनेक वर्ष जामिन मिळत नाही. इथे मात्र १२ तासात जामीन कसा काय मिळू शकतो, असे सांगत यात राजकीय हस्तक्षेप असू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे व उद्योजक श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार..

युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. तीन वर्षापासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती उत्पादकांचे अनेक वेळा मेळावे ही घेण्यात आले होते. यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी व युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये मोठे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.