Wildfires in Pune: पुण्यात वणव्यांची मालिका सुरूच; तीन महिन्यात ५६ घटना, ११७ हेक्टर वनक्षेत्र भक्ष्यस्थानी

प्रतिनिधी, पुणे : मार्च आणि एप्रिलमधील उन्हाच्या तडाख्याचा फटका पुणे जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांनाही बसला. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे चालू वर्षातील साडेचार महिन्यांत जिल्ह्यात (जानेवारी ते १५ मे) ‘फॉरेस्ट फायर अॅलर्ट सिस्टीम’वर वणव्यांच्या ९४९ नोंदी झाल्या. पुणे शहर आणि लगतच्या डोंगररांगांवर तीन महिन्यांत ५६ वणव्यांची नोंद झाली असून, त्यामध्ये ११६.७३ हेक्टर वन क्षेत्र होरपळले आहे.

जानेवारीपासूनच वणव्यांचे सत्र

वणव्याच्या सर्वाधिक घटना फेब्रुवारी, मार्चमध्ये नोंदवविण्यात आल्या. थंडीचा जोर ओसरला, की राज्यातील वन क्षेत्रात, डोंगररांगांवर वणवे पेटण्यास सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर वन विभागातर्फे दर वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात जंगलांतील आगी रोखण्यासाठी जाळपट्ट्या करण्याचे आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यास सुरुवात होते. यंदा मात्र जानेवारीपासूनच वणव्यांचे सत्र सुरू झाले. फेब्रुवारी, मार्चमध्ये संरक्षित वन क्षेत्रासह महापालिकेचे जैवविविधता संरक्षित क्षेत्र (बीडीपी) आणि खासगी टेकड्यांवर लक्षणीय प्रमाणात आगी लागल्या.

Nagpur News : नागपूरकरांची चिंता मिटली! यंदा पाणीटंचाई नाही, उन्हाळ्यातही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

शहरातील टेकड्यांवरही अग्निकल्लोळ


गेल्या चार महिन्यांत प्रामुख्याने सिंहगड, कात्रजच्या टेकड्या, वेल्हे, भोर या भागांतील डोंगररांगा, मावळ, मुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर वणवे पेटले. वेताळ टेकडीसह बावधन, कोंढवा आणि वाघोलीतील टेकड्यांवरही लहान-मोठ्या वणव्यांची नोंद झाली. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे एकीकडे पाणीटंचाई आणि दुसरीकडे उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पेटलेल्या वणव्यांनी जैववैविध्याचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील वणव्यांमधील ९५ टक्के वणवे मानवनिर्मित (उपद्रवी नागरिकांकडून) असल्याचा वन विभागाचा दावा आहे. एकीकडे उपद्रवी मंडळींची संख्या वाढत असतानाच शहरातील जागरूक, निसर्गप्रेमी वनाधिकाऱ्यांना वणवे आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

पाऊस घटल्याने वणवे वाढले

दुर्गम भागासह, गावापातळीवर, शहरांमधील डोंगरदऱ्या, टेकड्या, वन क्षेत्रात लागलेल्या वणव्यांची तातडीने माहिती मिळावी, यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाची ‘फॉरेस्ट फायर अॅलर्ट सिस्टीम’ आहे. कोणत्याही भागात वणवे लागल्यास सॅटेलाइट यंत्रणेद्वारे जवळच्या वन विभाग कार्यालयाला अॅलर्ट जातो. यंदा पाऊस कमी झाल्याने जानेवारीपासूनच वणव्यांचा आलेख चढता राहिला. त्यामुळे विविध भागांतून अॅलर्टचे प्रमाण वाढले.

पुणे विभागातील वणव्यांचा आलेख

महिना वणवे जळीत क्षेत्र (हेक्टर)

जानेवारी १ २

फेब्रुवारी २२ ३९.५

मार्च २० ४५.९

एप्रिल १३ २९.३३

एकूण ५६ ११६.७३

पाऊस जास्त झाल्यास झाल्यामुळे डोंगररांगावर मोठ्या प्रमाणात गवत उगवते आणि वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात वणवा पेटल्यानंतर होणारे नुकसान अधिक असते. गेल्या वर्षी पुण्यात सरासरीच्या तुलनेते कमी पाऊस पडला. त्यामुळे गवताची वाढ कमीच झाली. यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने वणवे पेटले आणि काहींकडून आग लावण्यात आली, त्यामुळे नुकसान झाले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वणव्यांची संख्या आणि बाधित क्षेत्रातही थोडी घट झाली आहे. अनेक ठिकाणी आम्ही लोकसहभागातून आगी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

– महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

वणव्यांत महाराष्ट्र दुसरा

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ महाराष्ट्रातही वणवे लागण्याचे प्रमाण मोठे आहे. एप्रिल आणि मे महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात वणव्यांत वाढ नोंदविण्यात आली. फॉरेस्ट फायर सिस्टीमवर आलेल्या अॅलर्टच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठ दिवसांत सर्वाधिक अॅलर्ट हिमाचल प्रदेशात (९२०) नोंदवले गेले असून महाराष्ट्र (२४८) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड (२१८), मध्य प्रदेश (२०८) आणि ओडिशा (१८०) यांचा अनुक्रमे तिसरा ते पाचवा क्रमांक लागतो.

वणवा पेटल्यास…

शहरानजीक किंवा अन्य कुठेही वणवा लागल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाच्या १९२६ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा.

वणव्यांमुळे मोठे नुकसान

– काही लोक रात्री जंगलात चूल पेटवतात, त्यातूनही वणवा पेटतो.

– कोरड्या हवेमुळे वाळलेले गवत पटकन पेटते. वाऱ्यामुळे आग पसरते.

– वन क्षेत्रातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फायदा उपद्रवी मंडळी घेतात.

– वणवे पेटविणाऱ्यांवर अपवादानेच कारवाई होते.

– उदबत्ती, जळती सिगरेट पेटल्याने आगीचा भडका.

– वणव्यांत प्राणी, पक्षी, कीटकांचा होरपळून मृत्यू होतो.