दाटून आलेले ढग, दिवसाही अंधार आणि पावसाची संततधार.. मुंबईत परिस्थिती काय?

केरळमध्ये मान्सूनचे आगमन होताच आता राज्यातही मान्सून आला असून मे महिन्यातच राज्यभरात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह उपनगरांमध्येही आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून आला आहे. अद्याप जूनचा पहिला आठवडाही आलेला नसतानाच पावसाने सर्वत्र लवकर हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा परिणा रेल्वे सेवेवरही दिसून येत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. हिंदमाता, दादर, परळ परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

आज पहाटेपासून ढग दाटून आल्याने काळोखलेलं वातावरण असून मुंबईकरांना अद्याप सूर्याचे दर्शन झालेलं नाही. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण असून शहरांसह उपनगरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत सकाळी 6 वाजल्यापासून सात वाजेपर्यंत पावसाची झालेली नोंद

नरिमन पॉईंट – 40 मिमी

ग्रॅण्ट रोड – 36 मिमी

कुलाबा – 31 मिमी

भायखळा – 21 मिमी

मुंबई शहरात गेल्या 24 तासात 58 मिमी इतक्या पावसाची नोंद

पूर्व उपनगरात 19 मिमी पावसाची नोंद

पश्चिम उपनगरात 15 मिमी पावसाची नोंद

सध्याची परिस्थिती पाहता, मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर सुरू आहे. काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाची माहिती :

अद्याप कोणत्याही भागात पाणी साचलेले नाही.

पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास अंधेरी सबवे, मालाड सबवे, दहिसर सबवे या सर्व ठिकाणी पाणी भरू शकते.

या भागांतून प्रवास करत असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करा. अधिकृत हवामान खात्याच्या सूचना तपासत राहा. दुचाकी किंवा पादचारी मार्गांनी अनावश्यक प्रवास टाळा अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

पुढील 3 दिवस कुठे-कुठे ऑरेंज अलर्ट ?

पुढील 3 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज’ इशारा आहे. मात्र 29 मेनंतर पावसाचा जोर मंदावेल, असा अंदाज व्यक्त होतोय. दरवर्षी प्रतीक्षा असलेला मान्सून रविवारी तळकोकणात दाखल झाला. हवामान खात्याच्या अहवालानुसार मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचली आहे. हा मान्सून येत्या तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सून तळकोकणात पोहोचल्यानंतर आता तो मध्य अरबी समुद्रासह मुंबईत पोहोचण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार मोसमी पाऊस पुढील तीन दिवसांत मुंबईत दाखल होईल. त्यादरम्यान मान्सून संपूर्ण कर्नाटकसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज आहे. पुढील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील दोन दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)