महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंबाने संघर्ष केला आहे. त्याग केला आहे. मराठी माणूस घडवला आहे. ठाकरे कुटुंबियांच्या या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदी, शाह, फडणवीस ठाकरे कुटुंबियांची तुलना करु शकत नाही. फडणवीस यांनी किती पैसा खर्च केला तरी काहीच होणार नाही. विधानसभा निवडणूक लाबाडीपणा करुन जिंकली आहे, परंतु महानगरपालिकेत जनता त्यांना जागा दाखवणार आहे, असा दावा शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे यांची गुरुवारी भेट झाली होती. त्यावरुन राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, फडणवीस यांना वाटते की, माझ्याकडे पैसा आहे, मी सर्वांना नाचवू शकतो. परंतु ठाकरे ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. त्याला कोणीच संपवू शकत नाही. हा ब्रँड अजिंक्य आहे. लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी आदर आहे, असे राऊत यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली त्याची सर्व माहिती आपल्याकडे आहे, असा दावाही राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस स्व:ताला मदारी समजत आहे. एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.
इस्त्रायल आणि इराण दोन्ही ट्रम्प यांचे ऐकत नाही. इराण आणि इस्त्रायलकडे अणूबॉम्ब आहे. दोन्ही देश आपल्या स्वाभिमानासाठी लढत असल्याचा दावा करत आहे. परंतु आम्ही ऑपेरशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐकून थांबवले. आम्ही त्यांच्या सांगण्यावरुन मागे हटलो. नरेंद्र मोदी आता परराष्ट्र दौऱ्यावर गेले आहे. त्या ठिकाणी ते प्रवचन देणार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.