Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्वाची असलेली मध्य रेल्वेची सेवा गुरुवारी पुन्हा विस्कळीत झाली. गुरुवारी दुपारी मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या. उल्हासनगर रेल्वे स्थानक येथे असणारी ओव्हरहेड वायर काही काळ बंद करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा झाला. काही काळानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. परंतु सध्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.
नेमके काय घडले?
मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरचा विषय झाल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू असताना ओव्हरहेड वायरवर पुलाच्या कामाची वायर पडली. त्यामुळे ठिणग्या उडाल्या. धोका लक्षात घेऊन स्टेशन मास्तरांनी तत्परतेने ओव्हर हेड वायर काही काळ बंद केली. त्यामुळे लोकल्स 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या होत्या. काही वेळाने रेल्वे सेवा उशिराने सुरू झाली.
21आणि 22 एप्रिल रोजी रेल्वेचा दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे या दोन दिवस रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. 24 एप्रिल रोजी रेल्वे सेवा सुरळीत होणार होती. परंतु ओव्हरहेड वायरचा विषय आल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
मुंबई लोकल ट्रेन नेटवर्क देशातील सर्वात व्यस्त आणि महत्वपूर्ण उपनगरी रेल्वे नेटवर्क आहे. रोज लाखो प्रवाशी लोकलने प्रवास करत असतात. मध्य, पश्चिम आणि हर्बल लाईन असे तीन नेटवर्कवर शेकडो लोकल नियमित धावतात. प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. परंतु इतर काही अडचणी आल्यावर रेल्वे सेवा विस्कळीत होते.
प्रवाशी समस्या सोडवण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांचा पुढाकार
ठाणे आणि नवी मुंबई विभागीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील स्थानके आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे महाव्यवस्थापकांनी समस्यांवर तोडगा काढण्याचे तसेच लवकरच स्थानकांचा पाहणी दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले.