vishalgad violence:  निवडणूक हरले म्हणून अशांतता निर्माण केली जातेयं, विशाळगड हिंसाचारावरून अस्लम शेख यांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटनेसह विविध संघटनांचे कार्यकर्ते रविवारी विशाळगडावर गेले होते. परंतु या आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळाले. यामध्ये काही व्यक्तींनी गडावरील लोकांना मारहाण केली आहे. यावरून आता कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अस्लम शेख आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज ( 16 जुलै) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आहे.

राज्यात हिंसाचार होतोय हे मोठं दुर्भाग्य

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या भेटीनंतर अस्लम शेख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”आपल्या राज्यात हिंसाचार होतोयं हे राज्याचं दुर्भाग्य आहे. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून होतंय. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत. महाराजांच्या नावाने पोलिसांवर हल्ला केला गेला. हे सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे. ज्या लोकांना पोलिसांनी थांबवायला हवं होतं त्यांना का थांबवलं नाही? संबंधित लोकांवर कारवाई करा”,अशी मागणी अस्लम शेख यांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे.
Prakash Ambedkar : विधानसभेपूर्वी ओबीसींसाठी आरक्षण बचाव यात्रा, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

एक निवडणूक हरले म्हणून असा प्रकार

अस्लम शेख यांनी महायुती सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” एक निवडणूक हरले म्हणून हे अशांततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. जनतेच्या मनात असुरक्षितता आहे यावर रश्मी शुकला यांनी देखील घडलेली घटना दुर्दैवी आहे असं म्हंटलं आहे.”

प्रकाश आंबेडकरांची टीका

विशाळगड अतिक्रमण प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, ”विशाळगडावर आधीपासूनच काही लोक होते त्यांनीच अतिक्रमण केलं. परंतु अतिक्रमण काढण्याचे काही नियम आहेत. ते लगेच काढता येत नाही. संभाजीराजे यांच्या आंदोलनात जो प्रकार घडला तेथे संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी धुडघूस घातला अशी माहिती आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. सरकारने या सर्व प्रकाराची योग्य दिशेने चौकशी करावी. आणि दंगलखोर कोण? याचा शोध घ्यावा.”