Vidhan Parishad : ११ जागांसाठी १२ उमेदवार, आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, कुणाची मते फुटणार?

प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषद निवडणुकीत आपापले उमेदवार निवडून आणताना आपले आमदार फुटू नयेत, दुसऱ्या पक्षांच्या गळाला लागू नयेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बुधवारी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलच्या चिरेबंदी वाड्यात मुक्कामाला ठेवले असले तरी त्यांच्या या वाड्याला भेगा पडणे फारसे अशक्य नाही. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने हे सर्व आमदार गुरूवारी दिवसभर विधिमंडळात कामकाजानिमित्त असल्याने तिथे कुठेही गुजगोष्टी व्हायला फारसा वेळ लागणार नाही. त्यामुळे रात्र थोडी सोगं फार अशी अवस्था या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाची होणार असल्याचे दिसते.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला शुक्रवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून ९ उमेदवार तर महाविकास आघाडीकडून ३ उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने आता महायुतीचा उमेदवार पडणार की महाविकास आघाडीचा याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
Sadabhau Khot : भाजपने तिकीट दिलं, पण मतांचं काय? सदाभाऊ खोतांची धावाधाव, आमदारांना गाठून विनवणी

आमदारांची फुटाफूट होऊ नये, दुसऱ्या पक्षाच्या गळाला आपला आमदार लागू नये यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना बुधवारी रात्री आणि गुरूवारी रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली आहे. ठाकरे गटाचे आमदार परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये तर भाजपचे आमदार कुलाब्यातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सांताक्रूझ विमानतळानजिकच्या ललित हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. इतर राजकीय पक्षांनीही आपापल्या आमदारांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. रात्री गुपचूप आमदार कोणाला भेटू नयेत, घोडाबाजार होऊन आपले आमदार फुटू नयेत यासाठीच ही काळजी घेण्यात आली आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्याने कितीही खाणा खुणा ठरवून दिल्या असल्या तरी नेमक्या कोणत्या आमदाराने कोणाला मतदान केले आहे हे सहजासहजी कळणे अवघड असते. त्यामुळेच पक्षाच्या सर्व आमदारांना एकत्रित ठेवले जाते.
MLC Elections : ठाकरे गटाची काँग्रेससोबत बैठक, नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव, भाजपही सावध

राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या कामकाजासाठी गुरूवारी दिवसभर आमदारांना विधिमंडळ परिसरात,सभागृहात यावे लागणार आहे. सभागृहाच्या व्यतिरिक्त तिथे विविध पक्षांच्या गटनेत्यांची, प्रतोदांची, विविध समित्यांच्या प्रमुखांची, अध्यक्ष, सभापती, उपाध्यक्ष, उप सभापती यांसह अधिकाऱ्यांच्या, मंत्र्यांची शेकडो कार्यालये आहेत. त्यामुळे ज्यांना काही गुप्तपणे बोलायचे आहे त्यांच्यासाठी विधिमंडळात हमखास अनेक जागा आहेत. त्यामुळे दिवसभर आमदार पाहिजे त्यांच्यांशी संवाद साधायला रिकामे आहेत. साहजिकच आता त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे पक्षाच्या नेत्यांना कठिण बनणार आहे.
MLC Elections : विधान परिषद निवडणुकीत दगाफटक्याची भीती, भाजप-शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, पण अंबानींमुळे बोंब

दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांच्या बैठका घेऊन त्यांना निवडणूकीत कशाप्रकारे मतदान करावयाचे याविषयीची रणनिती ठरवायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बुधवारी विधान भवनातील पक्ष कार्यालयात पार पडली. शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परिषद निवडणुकीत कसं मतदान करायचं आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मते कशी द्यायची? याची माहिती आणि मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले. महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मत, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मते कशी आणि कोणाला द्यायची याची सांख्यिकी रणनीती मुख्यमंत्री शिंदे यांनी ठरवल्याचे समजते.

मैदानात कोण कोण?

भाजप-पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर
शिवसेना-कृपाल तुमाने आणि भावना गवळी
ठाकरे गट-मिलिंद नार्वेकर
काँग्रेस-प्रज्ञा सातव
शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार-जयंत पाटील (शेकाप)