Vari 2024: वारी आली तरी इंद्रायणी फेसाळलेलीच! वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, प्रशासन कधी जागं होणार?

आळंदी, पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांचा १९३ वा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मात्र अद्यापाही फेसाळलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दहा वर्षपासून इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे.

इंद्रायणी प्रदूषणावर अनेकदा उपोषण झाले, आंदोलने झाली. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, त्यातून नदीत सोडले जाणारे सांडपाणी यामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. वारीच्या वेळी लाखो वारकरी या इंद्रयणीत आंघोळ करतात, यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. केमिकलं युक्त पाण्याने इंद्रायणी फेसाळली आहे. त्यामुळे तिच्या संवर्धानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. नदीच्या पाण्याचे नमुने देखील तपासणे आणि नदीतील पाणी हे प्रदूषित असल्याचे त्यांनी जाहीर देखील केले. मात्र याबाबत काही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. या इंद्रायणी नदी काठी असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्या रसायनामुळेच या नदीपात्रामध्ये फेस निर्माण होतो. नदीतील बायोकेमिकल ऑक्सिजनची (BOD) मात्रा ही ३० पेक्षा अधिक असल्याचं निदर्शनात आले आहे. मात्र तरीही कोणतीही ठोस पाऊले उचालली गेलेली नाहीत.

कुठून होतो इंद्रायणी नदीचा उगम…

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर असलेल्या नागफणी कठड्याजवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्यात पुढे टाटा धरण असल्याने इंद्रायणी नदी लुप्त पावते. त्यामुळे या नदीचा प्रवाह लोणावळा, कामशेत, कान्हे फाटा, वडगाव मावळ, तळेगाव आणि पुढे तीर्थक्षेत्र देहू, निघोजे, तळवडे, टाळगाव चिखली, मोई, मोशी, चिंबळी, श्री क्षेत्र आळंदी असा वाहतो आणि पुढे भीमा नदीला जाऊन मिळतो.

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान…

राज्याच्या कानकोपर्यातून लाखोच्या संख्येने भाविक देहू आणि आळंदित वारीसाठी येतात. या ठिकाणी मुकामी येताना जेवण इंद्रायणीत आंघोळ केल्यावर आपल्याला पुण्य मिळेल अशी सर्वसाधरण भावना वारकऱ्यांची असते. पण इंद्रायणीची ही अवस्था पाहून स्नान करन्याची इच्छा देखील होत नसल्याचे वारकर्यंकडून सांगण्यात येते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जर पालखी सोहळ्याच्या आधीच या प्रदूषित नदीची स्थिती सुधारले नाही तर वारकऱ्यांच्या आरोग्य प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कारणीभूत असलेल्या कारखान्यांवरती सरकार काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचा असणार आहे.