Today Top 10 Headlines in Marathi: मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा, अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे. अधिक बातमी इथे वाचा सविस्तर

२. अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिखर बँकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद उद्भवला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी परस्परांना लक्ष्य केले आहे.

३.राजू शेट्टींचा ठाकरे आणि पवारांवर गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीपासून हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना सोडली, असे महाविकास आघाडीकडून बोललं जात होत. यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील आणि सतेज पाटील या नेत्यांनी माझ्यासोबत शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली. मी उमेदवार असल्याने पक्षश्रेष्ठींशी बोलाव अशी त्यांची भूमिका होती. यामुळे मी उद्धव ठाकरे यांना दोन वेळा भेटलो तसेच शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. निवडणुकीनंतर माझी भूमिका काय असेल या संदर्भात त्यांनी ड्राफ्ट तयार केला. मात्र नंतर त्यांना जे करायचं आहे त्यांनी तेच करत माझी फसवणूक केली,असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे. अधिक बातमी इथे वाचा सविस्तर

४. ज्यांचे घर काचेचे त्यांनी मला दगड मारायला लावू नये

सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर अनेक आरोप केले. या आरोपाला आज किशोर दराडे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी विवेक कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांचे घर काचेचे आहे, त्यांनी मला दगड मारायला लावू नये. मी जर सर्वच काढलं तर यांना कोपरगावात फिरणे मुश्किल होईल, अशा शब्दात दराडे यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता यांच्यावर पलटवार केला आहे.

५.घाटात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

धुळे-सुरत महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटात ट्रक आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना काल शनिवारी १५ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

६.खुद्द मुख्याध्यापकांनी केलं सारथ्य

उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपून राज्यातील शाळा काल १५ जूनपासून सुरू झाल्या. अनेक शाळांमध्ये हा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. रांगोळ्या, ढोल-ताशांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. एकूणच उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा ‘किलबिलाट’ ऐकू आला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीवर मिरवणूक काढली. त्या बैलगाडीचं सारथ्य खुद्द जि.प.प्रा. शाळा पिंप्री बु. शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील करत होते.

७.घटस्फोटानंतर बायकोला इतकी दिलेली पोटगी

आपल्या अतरंगी अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारे दादा कोंडके यांची आजही तितकीच लोकप्रियता पाहायला मिळते. दादांचे चित्रपट हे डबल मिनिंग असायचे असे म्हटले जाते. पण आता या चित्रपटांना सुद्धा टीव्हीवर दाखवले जात आहे. त्यामुळे आत्ताच्या पिढीतील मुलांना सुद्धा दादांचा अभिनय अनुभवायला मिळतो. दादांनी त्याकाळी बॉक्स ऑफिसवर सिल्वर जुबली करून मराठी सिनेसृष्टी एक वेगळाच विक्रम केला होता. त्यांचा हा विक्रम आजतागायत कोणीच मोडू शकलेलं नाही.

८.पाकिस्तानचे पॅकअप पण सौरभ नेत्रावळकरचे टेंशन मात्र वाढले

पाकिस्तानचा संघ आता टी-२० वर्ल्ड कपच्या बाहेर पडला आहे. पण पाकिस्तानचे पॅकअप झाल्यावर आता अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचे टेंशन वाढलेले आहे. कारण एक मोठी गोष्ट आता समोर आलेली आहे.

९.शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी PM-KISAN योजनेच्या १७व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा PM-KISAN योजनेचा १७वा हप्ता जारी करणार आहेत. अधिक बातमी इथे वाचा सविस्तर

१०.सायबर चोरट्यांचा नवा फंडा

‘तुमच्या मोबाइलद्वारे मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाल्याचे ठोस पुरावे मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकास तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. शहरात याप्रकारे झालेली ही तिसरी फसवणूक आहे. याप्रकरणी ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.