महायुतीची ‘खिचडी’ शिजली?Image Credit source: गुगल
राज्याच्या राजकारणात दिलसे साद घालून सुद्धा उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची काही भेट झाली नाही. उद्धव सेनेने युतीची हाळी दिली पण मनसेने नेमकं कुणाला टाळी दिली हे आजच्या घडामोडीतून एकप्रकारे संकेत दिले आहेत. राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एक तासांहून अधिक काळ दोन्ही नेत्यांमध्ये गुप्तगू झाली. या भेटीचा कुठलाही तपशील अद्याप समोर आलेला नाही. राज ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वीच मनसेने आजचा दिवस गाजवला. मुंबईत आज सकाळपासून भेटी-गाठीच्या सत्रामुळे राजकारण चांगलेच तापले. पडद्याआड काय घडतायेत घडामोडी?
या ‘राज’कीय वळणाची चर्चा
दोन महिन्यांपासून राज्यात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची हलगी वाजत होती. त्यातच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असा हाकारा दिला. आता संदेश नाही थेट बातमीच देऊ असे ते म्हणाले. पण आज तर वेगळीच वार्ता धान्यी मनी नसताना कानी आली. त्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिकही गोंधळले. देवेंद्र फडणवीस यांनी अचूक टायमिंग साधले. त्यांच्या मुत्सद्देगिरीने दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा करणाऱ्यांना आणि मातोश्रीला थेट संदेश दिला आणि वार्ता पण पोहचवली.
मनसे नेते उदय सामंतांच्या भेटीला
सकाळी राज-देवेंद्र अध्याय संपत नाही तोच दुपारी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोतकर हे मंत्री उदय सामंतांच्या भेटीला पोहचले. त्यामुळे माध्यमांनीच महायुतीत आता मनसे पण दिसेल अशी दवंडी दिली. पण या भेटीमागील कारणं या दोघांनीही स्पष्ट केले. फडणवीस-ठाकरे भेटीचे गौडबंगाल समोर आलेच नाही उलट गोंधळ वाढत गेला. देशपांडे-खोत आणि सामंत यांच्या भेटीने त्यात अजून भर टाकली. गोंधळात-गोंधळ नि डोक्याला बाशिंग अशी काहींची अवस्था झाली.
भेटीचे कारण काय?
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट का घेतली याची मला कल्पना नाही. मी एक प्रस्ताव घेऊन सामंत यांच्या भेटीला आलो होतो. पनवेलमध्ये फुलबाजार सुरू करायचा आहे. त्यासंदर्भात आपण त्यांची भेट घेतली. यावेळी युतीची चर्चा वगैरे काही झाली नाही. युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होते. कार्यकर्ते युतीची चर्चा करत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
राज ठाकरे स्वतंत्र आणि स्वाभिमानी नेते
तर मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या भेटीवर मत व्यक्त केले. नवी मुंबईतील एका विकास कामासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे मला आणि श्रीकांत शिंदे यांना भेटले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातील दोन्ही भेटी आज झाल्या, हा फक्त योगायोग आहे. उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना अटी आणि शर्ती घातल्या त्याचवेळी मी म्हटले होते की, राज ठाकरे हे स्वाभिमानी आणि स्वतंत्र नेते आहेत. फडणवीस यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी त्याचा प्रत्यय दिला आहे, असे सामंत म्हणाले.