सोमवारी सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी कसारा इथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी लोकल निघाली होती. या लोकलमध्ये नेहमीप्रमाणेच प्रवाशांची मोठी गर्दी होती. 9 वाजून 10 मिनिटांनी ही लोकल मुंब्रा स्थानकाजवळ आली. गाडीमध्ये उभं राहण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने अनेक प्रवासी डब्याच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करत होते. ही लोकल जेव्हा मुंब्रा स्थानकाजवळ आली तेव्हा बाजूच्या रुळावरून कर्जत लोकल जात होती. तीव्र वळणामुळे दोन्ही लोकलच्या दरवाजांमध्ये उभे असलेले प्रवासी तसंच त्यांच्या बॅगा एकमेकांवर आदळल्या आणि 13 प्रवासी खाली पडले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. मृतांमध्ये उल्हासनगरच्या केतन सरोज या 23 वर्षीय तरुणाचाही समावेश होता. वाढलेल्या उकाड्यामुळे घाम येत होता म्हणून दरवाजात गेलेल्या केतनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
केतनचा मित्र दीपिक शिरसाठ याने ही हृदयद्रावक घटना सांगितली. “घाम येत होता म्हणून तो दरवाजात उभं राहायला गेला. पण लोकलमध्ये मोठी गर्दी झाली. दिव्यावरून गाडी निघाली आणि मुंब्र्याजवळ येताच बाजूने एक लोकल जोरात गेली. लोकलमधल्या कुणाचीतरी बॅग लागली आणि केतन पडला. आम्ही साखळी ओढून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. पण लोकल ठाणे स्थानकातच थांबली”, असं दीपकने सांगितलं. केतन आणि दीपक हे शेजारी राहणारे होते. दोघं शहाड स्थानकातून लोकल पकडून ठाण्यापर्यंत प्रवास करायचे.
उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील तानाजी नगरमध्ये केतन राहत होता. घरी आई-वडील आणि दोन लहान भावंडं असून घरची परिस्थिती बेताची होती. केतनने पदवी शिक्षण पूर्ण करून ठाण्यात वागळे इस्टेट इथल्या कंपनीत नोकरी मिळवली होती. दोन्ही भाऊ शिक्षण घेत असल्याने कुटुंबाची मोठी जबाबदारी त्याच्यावर होती. अपघाताची माहिती समजल्यानंतर जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, तर मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. जखमी, त्याचे नातेवाईक आणि मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झालं होतं.
गर्दीमुळे मुंबईकर नेहमीच जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. चेंगराचेंगरीत किंवा घाईघाईत रेल्वेमार्ग ओलांडताना त्यांचा जीव जातो. मुंब्रा इथल्या या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने सर्व दरवाजे स्वयंचलित करण्याचा निर्णय घेतला. तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातावर प्रतिक्रिया देणंही टाळलंय.