Mumbai Local : धावत्या लोकलमधून पडलेल्या ‘त्या’ प्रवाशांची नावं समोर

आज (सोमवार) सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास कसारा ते सीएसएमटी या धावत्या फास्ट लोकल ट्रेनमधून जवळपास दहाहून अधिक प्रवासी खाली पडले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि दोन महिला प्रवाशांचा समावेश आहे. मृत झालेल्या एका व्यक्तीचं नाव विकी बाबासाहेब मुख्यादल असल्याची माहिती कळव्यातील रुग्णालयाने दिली. तर दोन जण गंभीर जखमी असून त्यापैकी एकाला मेंदूशी निगडीत तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने तात्काळ ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. इतर सात रुग्णांची (पाच पुरुष, दोन महिला) प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं कळतंय. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी ही माहिती दिली. रुग्णालयात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि इतर वरिष्ठ अधिकारी रुग्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशांची माहिती-

  • कळवा रुग्णालयात एकूण दाखल रुग्ण- 10
  • मृत- 5 विकी बाबासाहेब मुख्यादल, राहुल गुप्ता, केतन सरोज, एक अज्ञात
  • गंभीर जखमी- 2 (शिवा गवळी, अनिल मोरे)
  • सिव्हिल रुग्णालयात चार प्रवाशांचा मृत्यू
  • स्नेहा कोंडे, प्रियांका भाटिया, आदेश भोईर, तुषार भगत, मनीष सरोज, मच्छिंद्र गोतराणे, रेहान शेख यांच्यावर उपचार सुरू

या अपघातावर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “अप आणि डाऊन मार्गावरील लोकल एकत्र धावत होत्या. त्यावेळी काही प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमींना ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जोपर्यंत पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका तयार होत नाही, तोपर्यंत चांगली सेवा देता येणार नाही. या दोन्ही लाईन तात्काळ सुरू व्हायला पाहिजे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे अधिकची रेल्वे सेवा वाढवण्याची मागणी मी केली आहे. लोकल ट्रेन्सचीही संख्या वाढवली पाहिजे.”

या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. “यापुढे नवीन गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसह येतील. त्याच्यामध्ये 238 एसी लोकल मुंबई उपनगरासाठी घेतले जाणार आहेत. या गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट असेल. तिसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे आताच्या लोकल गाड्यांना रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)