मान्सूनची काय खबरबात?Image Credit source: गुगल
भारतीय हवामान विभागाने (IMD) यावर्षी देशभरात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडेल, मान्सून (Monsoon) अधिक सक्रिय असेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे देशातील कृषी आणि अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. देशातील 42 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. तर शेतीचा भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 18% वाटा आहे.
मे जूनमध्ये आगीचे लोळ
भारतीय हवामान विभागानुसार, भारतात पुढील दोन महिने खासकरून मे आणि जून खूप तापणार आहेत. त्यानंतर मान्सूनची एंट्री होईल. उत्तर भारतातील लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहतात. त्यांच्यासाठी आयएमडीने आनंदवार्ता दिली आहे. आयएमडी प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या काळात सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात सरासरीच्या 105% इतका पाऊस होण्याची शक्यता असून, 87 सेमी हा दीर्घकालीन सरासरीचा आकडा आहे.
एल नीनोचा प्रभाव नाही
भारतीय उपखंडात पावसाला आतापर्यंत एल नीनो या चक्रीवादळाने प्रत्येकवेळी खोडा घातला आहे. पाऊस कमी होण्याचे एल नीनो हे सर्वात प्रमुख कारण ठरले आहे. पावसाळा हा सामान्यपणे 1 जूनच्या जवळपास केरळमध्ये हजेरी लावतो. तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तो सक्रिय असतो. केरळमध्ये प्रवेश करणारा पाऊस पुढे पश्चिमी घाटाच्या मार्गाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि दिल्लीत हजेरी लावतो. उन्हाळ्यात उन्ह कमी व्हावं अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. तर पावसाळ्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा असते.
मुसळधार पाऊस
IMD नुसार, जेव्हा एखाद्या ठिकाणी 24 तासांत 204.5 मिमी अथवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. तेव्हा त्याला मुसळधार पाऊस (Extremely Heavy Rainfall) म्हटले जाते. तर एखाद्या हवामान केंद्रावर एका दिवसात झालेला पाऊस त्या महिन्यातील अथवा ऋतुमधील सर्वाधिक नोंदवलेल्या प्रमाणाच्या जवळ असतो, तेव्हा अपवादात्मक मुसळधार पाऊस (Exceptionally Heavy Rainfall) म्हणून त्याची नोंद होते. यंदा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.