पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे, वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरा, नंदण आणि दिराला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी पाच जणांना देखील अटक करण्यात आली आहे, वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला मदत केलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केलं आहे. या प्रकरावर प्रतिक्रिया देताना आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
वैष्णवी हगवणेच्या शरीरावर तब्बल 19 जखमा होत्या, सर्व जखमा तिच्या मृत्यूच्या दिवशीच्या होत्या, तिचा मृत्यूच मुळात संशयास्पद आहे. पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू अशी करणे अपेक्षित होतं. परंतु त्यांनी त्याला आत्महत्या असं नाव दिलं, त्यामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निलेश चव्हाण वरती यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत, पुणे ग्रामीण पोलिसांनी निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना नाकारला होता, मात्र जालिंदर सुपेकर यांच्या शिफारसीने त्याला शस्त्र परवाना मिळाला. बड्या लोकांचा, राजकीय लोकांचा आणि पोलिसांचा वरदहस्त आहे. मयुरी हगवणेची तक्रार न घेता करिष्मा हगवणेची तक्रार महिला आयोगानं घ्यावी, हे सर्व अतिशय गुंतागुंतीचं आणि संशयास्पद आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
आणखी पाच जणांना अटक
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी आधी तिचा पती, सासू, सासरा, दीर आणि नणंद यांना अटक केली, दरम्यान वैष्णवीचा सासरा फरार असताना त्याला ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्यांना देखील आता पोलिसांनी अटक केली आहे, यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे, वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली होती, सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत.