Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ सुप्रिया सुळेंचा बॅनरबाजीवरुन अजितदादांना सल्ला, भाजपला टोला

बारामती, दीपक पडकर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीच्या निमित्ताने आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकारातून आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अगोदर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध विषयावर भाष्य केले. यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, तो म्हणजे बारामती मध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाच्या वतीने जनसन्मान मेळावा पार पडला. याच मेळाव्याच्या निमित्ताने बारामती मध्ये सर्व ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावले होते. त्यामुळे बारामती गुलाबी झाली, मात्र बारामती मध्ये फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करू नका असे सांगणाऱ्या नेत्यांच्याच पक्षाने हे फ्लेक्स फलक लावले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा प्रश्न त्यांचा आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. मात्र माझे म्हणाल, तर मी अशा फ्लेक्सच्या भानगडीत पडत नाही, जे कायद्याला धरून आहे तेच केले. पाहिजे अशी माझी धारणा आहे. दुसरी गोष्ट ज्यांनी कायदे केले त्यांनी स्वतः पासूनच ते पाळले पाहिजेत. माझे तर सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की फ्लेक्सबाजी टाळावी.
दादांचा बारामतीत विकास पण मतदारांची तुम्हाला साथ, शरद पवार म्हणाले- ती बारामती आहे बाबा!

शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईनच होत नाही भाजपची हीच मोठी अडचण…

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या नेत्यांनी शरद पवार यांना टार्गेट केले आहे. या संदर्भात विचारले असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्या बिचाऱ्यांची हेडलाईनच होत नाही. तो त्यांचा दोष नाही. शरद पवार यांना वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते, आज ४६ वर्ष उलटली आहेत, पण शरद पवारांशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पानही हालत नाही ही वस्तुस्थिती आहे.

खेडकर कुटुंबाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे वैतागल्या..!

मनोरमा खेडकर यांना आज पोलिसांनी अटक केली. या संदर्भात पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी माध्यमांसमोर हात जोडले आणि सांगितले, या सर्व प्रश्नांपेक्षा बेरोजगारी, महागाई आणि सुरक्षा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रश्न महत्त्वाचे आहेत, दररोज आम्हाला हाच प्रश्न विचारला जात आहे. आम्ही यावर अनेकदा भाष्य देखील केले आहे. परंतु याचा सर्व रिपोर्ट एकत्र येऊ द्यात. मग आपण यावर बोलू, मात्र तोपर्यंत तरी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षितता या विषयावर आपण सर्वांनी प्रश्न विचारावेत ही माझी विनंती आहे.