ट्रेकिंगचा प्लान तरूणांच्या अंगलट
उन्हाळ्याची सुट्टी लागली की अनेकांचे बाहेर फिरण्याचे तर काहींचे ट्रेकिंगचे प्लान ठरतात. मुंबईतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरूण-तरूणींच्या ग्रुपने देखील असाच प्लान ठरवला आणि थेरान डोंगरा शेजारील पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. मात्र त्यांचा ट्रेकिंगचा हाच प्लान त्यांच्या अंगलट आला. कारण किल्ल्यावर जात असताना, ते रास्ता भरकटले, त्यातच अन्न-पाणी संपल्याने आणि उष्मघातासारखी परिस्थिती उद्भवल्याने त्या ग्रुपमधील एक तरूणी बेशुद्ध पडल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली. मात्र या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच, त्यांनी सदर तरुणांना रेस्क्यू करण्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला पाचारण करण्यात केले आणि अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर त्या ग्रुपची सुखरूप सुटका झाली.
ट्रेकसाठी किल्ल्यावर गेले पण..
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे 21 ते 22 या वयाच्या आसपास असलेले, कॉलेज तरुण-तरुणी ट्रेकला निघाले होते. सोनू साहू, निकिता जोबी, निखिल सिंग, साहिल लाले, चेतन पाटील, तेजस ठाकरे तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेली हिबा फातिमा अशी त्यांची नावे आहेत. तरुणांचा हा ग्रुप शनिवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानच्या शेजारील पेब किल्ला अर्थात विकट गड या ठिकाणी ट्रेकला गेले होते. नेरळ स्थानकापासून रिक्षाद्वारे आनंदवाडी येथे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पेब किल्ल्याच्या दिशेने भर उन्हात डोंगर दर्यांची चढाई करत असताना येथील जंगलातील मार्ग चुकल्यामुळे आपल्या कडून किल्ल्याकडे जाणारा रस्ता भरकटला आहे असे या तरुणांच्या लक्षात आले.
रस्ता भरकटला, उष्माघाताचाही त्रास
त्यातच त्यांनी सोबत आणलेलं खाण्या-पिण्याचं साहित्य संपले असताना दुपारी उन्हाचा ताप देखील वाढला. त्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने व त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध नव्हते. यामुळे हिबा ही तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर सोनू साहू तसेच अन्य सहकाऱ्यांना देखील उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने घाबरलेल्या अवस्थेत तरुणांनी झालेल्या प्रकाराबाबत आपल्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींना दूरध्वनी वरून माहिती दिली. नातेवाईकांनी या किल्ल्यापासून जवळच असलेल्या माथेरान वनविभाग,पोलिसांसह नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी क्षणाचाही विलंब न करता शिवाजी ढवळे यांनी या तरुणांच्या बचाव कार्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेचे वैभव नाईक,चेतन कळंबे, संदीप कोळी, महेश काळे, सुनील कोळी,विकी फाळे, राहुल चव्हाण, सुनील ढोले दिनेश सुतार तसेच स्थानिक आदिवासी तरुण राम निरगुडा, काळूराम दरोडा यांना देखील पाचारण करण्यात आले होते. सोबत आपल्या नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप फड, पोलीस हवालदार निरंजन दवणे,निलेश कुमरे, दत्ता किसवे, सचिन वाघमारे, विनोद वागणेकर, सुनील गरजे अशी एक टीम तसेच वैद्यकीय पथक त्याचबरोबर माथेरान वनविभागाचे प्रथमेश पार्टे तनुज शिंदे, अंकित पार्टे यांना देखील घटनास्थळावर रवाना केले. यावेळी सह्याद्री रेस्क्यू टीमचे टीम लीडर चेतन कळंबे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या सात ही तरुणांना अत्यावश्यक असलेले वैद्यकीय व खाण्याचे साहित्य, पाणी,तसेच मानसिक आधार देत गडावरून सुखरूप खाली आणले व नेरळ पोलीस तसेच आलेल्या नातेवाईकांकडे स्वाधीन केले.