आगामी निवडणुकासाठी शिंदेंचं खास मिशन, भाजपचं टेन्शन वाढणार ; घमासान होणार
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागलेले असतांना  सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं १०० पेक्षा अधिक उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र असे असले तरी महायुतीत अद्यापपर्यंत जागावाटप झालेली नाही. पण शिंदेंच्‍या तयारीमुळे भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. यातूून विधानसभेच्‍या निवडणूकीत जबरदस्‍त घमासान पहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटप सुरु असताना शिंदेसेनेला बरीच रस्सीखेच करावी लागली होती. हक्काच्या जागा मिळवतानाही शिंदेसेना मेटाकुटीस आली. त्यांना १५ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या अनेक पारंपारिक जागांवर त्यांना पाणी सोडावं लागलं. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सर्वाधिक जागा शिंदेसेनेच्‍या होत्‍या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाआधी शिंदे आघाडीवर आहे.

२०१९ मध्ये शिवसेना एकसंध होती. त्यावेळी विधानसभेला भाजप, शिवसेनेची युती होती. त्यावेळी शिवसेनेनं १२४ जागा लढवत ५६ जागा जिंकल्या. शिवसेनेनं जिंकलेल्या ५६ जागांसह सेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघांवर शिंदेसेनेचा दावा आहे. या जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदेसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शिंदेसेनेनं निरीक्षक, प्रभारी नेमले आहेत. हे नेते मतदारसंघांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबद्दलचा सविस्तर अहवाल शिंदेंना देतील. पक्ष कुठे, किती मजबूत आहे याचा तपशील या अहवालातून स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. शिंदेसेना १०० जागा लढण्यासाठी आग्रही आहे.महायुतीत असलेल्या भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी असलेला आग्रह, मागण्या पाहता लोकसभेप्रमाणेच यंदाही रस्सीखेच पाहायला मिळू शकते. शिंदेसेनेनं १०० जागांची मागणी केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ८० ते ९० जागांची मागणी केली. तर सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप १५० पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. तिन्ही पक्षाच्या मागण्या पाहता विधानसभेला जागावाटपावेळी बरीच चढाओढ पाहायला मिळेल.