शरद पवार यांचे अखेर एक घाव, दोन तुकडे… अजितदादांसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाले, संधीसाधू…

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तशी सूचक विधानेही केली जात होती. त्यामुळे या चर्चांना बळ मिळत होतं. पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एक घाव, दोन तुकडे करत अखेर या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी आज स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एकीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी अजितदादांसोबत जाण्याच्या चर्चेवर भाष्य करत हा विषयच संपवून टाकला. अनेक लोक वेगळ्या विचाराचे आहेत. कुणी तरी आता म्हणालं सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांनासोबत घेणं मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहीत करायचं नाही. त्यादृष्टीने पावलं टाकायचं आहे. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.

गेले त्यांची चिंता करू नका

एका विचारानं काम करणाऱ्या संघटनेची गरज आहे. हे संघटन राष्ट्रवादी देऊ शकतो. निवडणुका येतात आणि जातात. पण त्या निवडणुकीत आपण लक्ष दिलं पाहिजे. नवीन नेतृत्वाची फळी तयार करणं, नव्या नेतृत्वाच्या फळीतून विकासाचं कामकाज उभं करण्याची गरज आहे. विकासाच्या कामाला गती देण्यासाठी चित्र बदललं पाहिजे. नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी चांगली कामगिरी केली पाहिजे. हे करण्यासाठी संघटन मजबूत केलं पाहिजे. काही लोक गेले. नवीन काही लोक येत आहे. गेले त्यांची चिंता करू नका. अनेक लोक येत आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

माझ्या आयुष्यात…

माझ्या आयुष्यात मला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. 1978 साली मुख्यमंत्री होतो. 80मध्ये माझं सरकार बरखास्त झालं. निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आमचे 70 आमदार निवडून आले. दोन महिन्यांनी मी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिकडे होते. इकडे 10 दिवसात चमत्कार झाला. 70 पैकी 6 सोडून बाकी सर्व आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा पक्ष संघटनेत लक्ष घातलं. लोकांशी संपर्क वाढवला. पाच वर्षाने निवडणूक झाली. जे सोडून गेले त्यापैकी 90 टक्के लोकांचा पराभव झाला होता. पुन्हा आमचा पक्ष महत्त्वाचा पक्ष झाला, असा किस्सा पवारांनी ऐकवला.

लोक शहाणे आहेत…

कोण आला, कोण गेला त्याची चिंता करू नका. लोक शहाणे आहेत. या देशाची लोकशाही नेत्यांमुळे टिकली नाही. सामान्य लोकांच्या सामुदायिक शहाणपण आणि एकीतून लोकशाही टिकली आहे. त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं आणि त्यासोबत उभं राहण्याचं काम करावं लागेल, असंही ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)