शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्रImage Credit source: गुगल
शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानले आहे. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले असे गौरद्वगार पवार यांनी काढले आहे. त्यांच्या या पत्राविषयी त्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा माहिती दिली.
तीन महापुरूषांचे पुतळे उभारण्याची मागणी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाण असलेल्या तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. तर पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत, अशी मागणी काही साहित्यिकांनी केली आहे.
तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावे, अशी मागणी शरद पवार यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली
राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशी परिस्थिती यापूर्वी बीडमध्ये कधीच नव्हती. सर्वांना सोबत घेऊन बीड जिल्हा जात होता. तिथे सामंजस्याचे वातावरण होते. जो कोणी कायदा हातात घेईल, तो कोणी का असेना त्याच्यावर कारवाई व्हावी असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रण देत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यात दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थिती लावण्याची विनंती करण्यात आली होती. पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाची जगभर चर्चा झाली. यामधील राजकीय वाद पण गाजला होता. आता शरद पवार यांनी या संमेलनाला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.