विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? शरद पवार पुन्हा सुपरहिट पॅटर्न वापरण्याच्या तयारीत
मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी जागावाटपाचा विषय लवकर मार्गी लावण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि ठाकरेसेनेला प्रत्येकी १००, तर शरद पवार गटाला ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेतून ही आकडेवारी समोर आली आहे.लोकसभेत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. १७ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला १३ जागांवर यश मिळालं. गेल्या लोकसभेला काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळाली होती. पण यंदा १३ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसनं विधानसभेला १०० पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. पण मविआतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस १०० जागांवर लढेल.

लोकसभेला सर्वाधिक २१ जागा लढवणाऱ्या ठाकरेसेनेला केवळ ९ जागांवर यश मिळालं. लोकसभेला मविआमध्ये सर्वाधिक जागा ठाकरेसेनेनं लढवल्या. पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. पण विधानसभेला ठाकरेसेना ९० ते १०० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मविआमध्ये शरद पवार गट सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला ८० जागा मिळू शकतात. तर उर्वरित जागा लहान पक्षांना सोडल्या जाऊ शकतात. छोट्या पक्षांना ८ ते १० मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीचं जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मविआचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ‘मित्रपक्षांमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होतील. त्यातून जागावाटपाबद्दल एकमत होईल. प्राथमिक चर्चेनुसार, काँग्रेस, ठाकरेसेनेला प्रत्येकी १००, तर शरद पवार गटाला ८० जागा सुटू शकतात. बाकीच्या जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील. जागावाटपात फार मोठे बदल होणार नाहीत,’ अशी माहिती या नेत्यानं दिली.

मविआतील तीन मोठ्या पक्षांनी प्रत्येकी ९० जागा लढवाव्यात असं शरद पवार गटानं सुचवलं होतं. पण काँग्रेस आणि ठाकरेसेनेनं अधिकच्या जागांची मागणी केली. ‘आम्हाला ८० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. पण आम्ही आकड्यावरुन आडमुठी भूमिका घेणार नाही. त्यापेक्षा आम्ही स्ट्राईक रेटवर अधिक लक्ष देऊ आणि अधिकाधिक जागा जिंकू,’ असं शरद पवार गटाच्या नेत्यानं सांगितलं.

लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत सर्वात कमी जागा शरद पवार गटानं लढवल्या. पवार गटानं केवळ १० जागांवर निवडणूक लढवली. यापैकी ८ जागांवर त्यांनी विजय मिळवला. तुतारी चिन्हामुळे झालेल्या संभ्रमानं साताऱ्याची जागा गेली, अन्यथा आम्ही ९ जागा जिंकल्या असत्या, असा दावा पवार गटाच्या नेत्यांनी केला. शरद पवार गटाचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ८० टक्के होता. राज्यातील कोणत्याच पक्षाला अशी कामगिरी जमलेली नाही.