संजय राऊतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
धुळे येथील शासकीय विश्रामगृह, गुलमोहर येथे पैशांचा मोहर दिसला. कोट्यवधींची रोकड सापडली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पाच तास ठिय्या आंदोलन केले. गोटे आणि खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात अंदाज समितीचे नेतृत्व करणारे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आज झालेल्या पत्र परिषदेत संजय राऊतांनी याप्रकरणात एकूणच सरकारच्या भूमिकेवर चांगलेच तोंडसुख घेतले. तर याप्रकरणात पुरावे नष्ट करण्यात येतील असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याऐवजी गुन्हा का दाखल केला नाही असा खडा सवाल विचारला.
पुरावे नष्ट केल्या जातील
याप्रकरणात अर्जुन खोतकर हे अंदाज समितीचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी किती बैठका घेतल्या. कुठे कुठे बैठका घेतल्या. याविषयीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यावेळीच याप्रकरणी पुरावे नष्ट करण्यात येतील. एकनाथ शिंदे हे पुरावे नष्ट करतील. शासकीय अधिकारी त्यासाठी मदत करतील असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
तर आम्हाला आनंद झाला असता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याऐवजी ताबडतोब गुन्हा दाखल केला असता आणि त्या पीएला अटक केली असती, हे प्रकरण ईडीकडे वर्ग केले असते तर आम्हाला आनंद झाला असता. कारण पाच पन्नास हजारांच्या केसेस फडणवीस यांनी ईडीकडे सुपूर्द केल्या आहेत. मग इतकी मोठी रक्कम सापडूनही फडणवीस कोणाला वाचवत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. विधीमंडळाची बदनामी करणाऱ्या अर्जुन खोतकर यांना वाचवत आहेत की स्वतःला वाचवत आहे, असा घणाघात राऊतांनी घातला.
एसआयटीला कालमर्यादा का नाही. एसआयटीचा अहवाल, त्याची चौकट काय आहे, याविषयी काहीच समोर येत नाही, याचा खुलासा व्हायला हवा असे ते म्हणाले. तर ज्या पद्धतीने अंदाज समिती ठिकठिकाणी गेली.तिथे कोणत्या विश्रामगृहात, कोणत्या हॉटेलमध्ये खोतकरांनी त्यांच्या बॉससाठी पैसे जमा केले, हे जर फडणवीस यांना हवे असेल तर मी ते त्यांना द्यायला तयार आहे, असे राऊत म्हणाले.