Sanjay Raut: शहा हे देशाला धोका, गृहमंत्री झाल्यापासून जम्मू-काश्मीर अशांत, संजय राऊतांकडून टीकास्त्र

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंवर हल्ला झाला, त्यात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. यावरुन शिनसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात १८ लोकांचा मृत्यू झाला. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. सातत्याने जम्मूमध्ये हल्ले सुरू आहेत. आज सुद्धा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला आणि त्यात एक जवान शहीद झाला आहे.

३७० कलम हटवूनही काश्मीरमध्ये शांतता आलेली नाही, हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर हल्ले सुरू झाले आहेत. अमित शहा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात. परंतु काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाहीत. असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या देशाच्या छातीवर बसविला आहे. देशाच्या असंख्य शहिदांचा अपमान केलेला आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

कायदा सुव्यवस्थेचा विचार न करता राजकीय फायद्याचा विचार केला जातो. अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून सातत्याने जम्मू-काश्मीर अशांत आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला पाहिजे. त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची जबाबदारी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

देश संकटात आहे – संजय राऊत

मोहनराव भागवत काल बोलले ते कृतीत दाखवा, असंही संजय राऊत म्हणाले. प्रवचन जास्त झालेली आहे, देश संकटात आहे, एक अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे. हे सरकार चालविण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतील याबाबत आमच्या मनात शंका आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे कोणाला सांगता येणार नाही. जेपी नड्डा यांनी सांगितलं होतं की आम्हाला आर एस एस ची गरज नाही, असंही ते म्हणाले.