Sanjay Raut: मोदींसारख्या तपस्वीला किमान ८०० जागा मिळायला हव्या, तरच…, राऊतांची खोचक टीका

मुंबई: लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या दोन दिवसांवर आले आहेत. ४ जूनला निवडणुकांचे निकाल येतील. यापूर्वी देशात कोणाचं सरकार स्थापन होणार याचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल जाहीर झाला. यामध्ये यंदाही देशात मोदी सरकार येताना दिसत आहे. यावर आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून नरेंद्र मोदींच्या ध्यान तपस्येवरही निशाणा साधला आहे.

मला वाटलं भाजपला ८००-९०० जागा मिळतील, राऊतांचा खोचक टोला

एक्झिट पोलमध्ये भाजपला ३३ जागा दाखवल्या, जागा २६ आणि दाखवल्या ३३, मला वाटलं हे भाजपला ८००-९०० जागा देतील. कारण, मोदींनी एवढं ध्यान केलं, इतके कॅमेरे लावले, त्यामुळे ३६०-३७० तर काहीच नाही, अशा तपस्वीला किमान ८०० जागा मिळायला हव्या, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेल, असं म्हणत संजय राऊतांनी मोदींच्या ध्यान साधनेवर खोचक टीका केली.

एक्झिट पोल फ्रॉड – संजय राऊत

अत्यंत फ्रॉड हा एक्झिट पोल आहे, ऑपिनिअन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षांपासून कसे चुकीचे ठरतात आणि भाजप या देशाचं गृहमंत्रालय आणि यंत्रणा कशाप्रकारे यावर प्रभाव टाकतेय सगळ्यांना माहितीये.

अमित शहांकडून धमक्या

जयराम रमेश यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, गेल्या २४ तासात अमित शहा यांनी देशातील जवळपास १८० डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करुन जवळजवळ धमकावलं. जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल तर अशा प्रकारे ध्यान तपस्या करुन, धमक्या देऊन निवडणुकी जिंकता येणार नाही.

देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार, राऊतांना विश्वास

इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार, २९५ ते ३१० हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल, महा माहितीये देशात आणि राज्यात काय होणार आहे. २९५ ते ३१० इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत.

माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही – संजय राऊत

एक्झिट पोल बनवणाऱ्या १०० कंपन्या आहेत. हे काय फुटक करतात का? ज्याची खाव पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे. जो दिल पेजेला त्याच्या शेजेला, अशा या कंपन्या आहेत. मोठे पक्ष हवे तेवढे पैसे देतात आणि हव्या तशे पोल घडवतात. हा देशातील गेल्या १० वर्षातील इतिहास. माझा या एक्झिट पोलवर विश्वास नाही.