Sanjay Raut: राज्य सरकार सध्या गुंडांच्या हातात, कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्य सरकार सध्या गुंडांच्या हातात असल्याचा गंभीर आरोप करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Udayanraje Bhosale: यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण…; खासदार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना इशारा
कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसलेले आहेत. या राज्यातील कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सरकारच गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोसणाऱ्यांचे आता सरकार आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगातून गुंडांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, कारण लोकांचा कौल त्यांच्या बाजूने होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे आणखी दोन-तीन मंत्री आहेत. राज्यातही खोट्या प्रकरणांमध्ये ईडी आणि सीबीआयने अनेकांना अडकवले असल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने चांगलीच चपराक मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला. त्यांना यश मिळू दिले नाही. त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. गेल्या काही वर्षांमध्ये या देशांमध्ये लोकशाहीत एक डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. या खेळात ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा वापर सुरु आहे असेही ते म्हणाले.